मुंबई | Mumbai
एकीकडे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण म्हणजे बेळगावमध्ये होणाऱ्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्याने सीमावासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. यावरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
बेळगाव सीमावाद प्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यापासून रोखण्यात आल्याने त्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधानसभेत पहायला मिळाले. या मेळाव्याला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण तापले होते. ज्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत बेळगाव-कारवार भाग केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे.
आदित्य ठाकरेंनी काय म्हंटले आहे पत्रात?
आदित्य ठाकरेंनी पत्रात लिहिले की, सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. आजच सभागृहामध्ये प्रथेप्रमाणे आपला परिचय झालेला आहे. त्याबद्दल सर्व सदस्यांनी आपले अभिनंदन ही केलेले आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेळगाव आणि कारवारचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नी मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे हे आपण जाणताच. बेळगाव कारवार प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. मी आपणास कळकळीची विनंती करत आहे की बेळगाव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याव द्यावा. आपण सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगांव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा आम्ही एक मताने या ठरावास पाठिंबा देऊ. बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती.
दरम्यान, न्यायालयात बेळगाव प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत तो परिसर केंद्रशासित करावा ही आमची कायम भूमिका आहे. मराठी माणूस लाडका आहे की, नाही हे सरकारने दाखवून द्यावे. मराठी माणसावरील अन्याय दूर करण्याबाबत सरकारने भूमिका मांडावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.