मुंबई । प्रतिनिधी Mumbai
गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी बेकायदा पोस्टर,बॅनर-होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला तर नागरिकांना तो मोठा दिलासा ठरेल. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण याबाबत पुढाकार घ्या. राजकीय पोस्टर-बॅनरवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घ्या. मी आणि माझा पक्ष याबाबत आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केले आहे.
आदित्य ठाकरे पत्रात लिहितात, गेल्या दोन वर्षांत मुंबई महापालिकेकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत. आपण या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो. यामुळे आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल. जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत.
मी आपल्याला विनंती करतो की आपण या दिशेने पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत. आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही, विरोधी पक्ष म्हणून असलो तरी ह्या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण ह्या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील असे आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा