संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना समवेत घेऊन जाणारा मानवतेचा विचार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी अशा कठीण काळात हा विचार पुढे नेण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण दिली. विकास लवांडे यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
संत परंपरेचे विचार सांगणारे विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे यांनी आळंदी येथे शाईफेक हल्ला केला. या घटनेचा तीव्र निषेध करून माजी मंत्री थोरात म्हणाले, विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र या हल्ल्याला ते धीरोदत्तपणे सामोरे गेले आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी अशा कठीण काळात आपला विचार जोपासण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण आपल्याला दिलेली आहे. हा विचार पुढे घेऊन जाताना पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणार्यांवर होणारे हल्ले हे चिंताजनक आहे. यापूर्वी प्रवीण गायकवाड, हनुमंत पवार यांच्यावरही असे हल्ले झाले आणि आता लवांडे यांच्यावरही हल्ला झाला आहे.
खरेतर प्रतिवाद करायला त्यांना संधी आहे. ते सांगू शकतात की आमचे वारकरी विचार असे आहेत आणि त्यांनी ते सांगितले पाहिजे. मात्र तसे न करता हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. दुर्दैवाने शासन त्यांना पाठीशी घालते आहे हे वाईट आहे. महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का लावणार्यांना सरकार पाठिशी घालत आहे. वारकरी संप्रदायातील सर्वांनी अत्यंत जागृतपणे या घटनेकडे पाहिले पाहिजे. विचारातून प्रतिवाद करा. पण प्रतिवाद न करता, विचार न मांडता हल्ला करणे ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. विशेष म्हणजे अशा लोकांना शासन पाठिशी घालते हे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली.





