Saturday, May 2, 2026
Homeनगरलिंकिंग प्रकारांमुळे 12 कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

लिंकिंग प्रकारांमुळे 12 कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता || राहुरी, नेवासा, कोपरगावच्या केंद्रांचा समावेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये खतांची लिकिंग (संलग्न विक्री), जादा दराने खते विक्री, विक्री व्यवहार नोंदीतील त्रुटी आदी प्रकार निदर्शनास आल्याने राहुरी, नेवासा आणि कोपरगाव तालुक्यांतील 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. खरीप हंगाम 2024-25 मध्ये शेतकर्‍यांना दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दरात मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरीय गुणनियंत्रण निरीक्षक व भरारी पथकाच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान विविध कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर नियमभंग आढळल्यामुळे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले.

- Advertisement -

त्यासोबतच पुर्ण तपासणी करून विविध निविष्ठांंचे नमुने काढणे, खत विक्री व्यवहार नोंदी, ज्यादा दराने खते विक्री, खतांची लिकिंग असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कृषी निविष्ठा विक्री कायदे व नियम नुसार कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. तपासणीदरम्यान, राहुरी, नेवासा आणि कोपरगाव तालुक्यांतील 12 कृषी सेवा केंद्रांमध्ये खतांची लिकिंग (संलग्न विक्री), जादा दराने खते विक्री, विक्री व्यवहार नोंदीतील त्रुटी आदी प्रकार निदर्शनास आले. संबंधीत कृषी सेवा केंद्र चालकांना म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली.

संबंधित विक्रेत्यांची सुनावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात घेण्यात आली व त्यानंतर त्यांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील कारवाई प्रक्रियेनुसार केली जाणार आहे. शेतकर्‍यांनी खते किंवा अन्य कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दोन परवाने कायमस्वरूपी निलंबित
राहुरी तालुक्यातील तीन, नेवासा तालुक्यातील सहा तर कोपरगाव तालुक्यातील तीन अशा 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, त्यापैकी राहुरी तालुक्यातील एक व कोपरगाव तालुक्यातील एक अशा दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले असून इतर 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने तीन महिने ते एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी सांगितले.

नियमांचे पालन करण्याचे निर्देश
जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी कृषी निविष्ठा कायद्यांतर्गत असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे व शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्या

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला...

0
मुंबई | Mumbai एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup...