Thursday, April 23, 2026
Homeनगरअहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे राष्ट्रीय स्मारक होणार

अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे राष्ट्रीय स्मारक होणार

पालकमंत्री विखे पाटलांच्या निर्णयाचे शाळीग्राम होडगरांकडून स्वागत

आश्वी |वार्ताहर| Ashwi

अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांनी स्वागत केले असून, या स्मारकामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास जगासमोर येईल आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदेशाचे कृतीत रुपातंर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

यासंदर्भात बोलताना होडगर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव हे आपल्या जिल्ह्यातील असले तरी, त्यांचे संपूर्ण जीवन हे देशासाठी समर्पित झाले. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणणे खूपच गरजेचे होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हिंदू धर्मावर असलेली श्रध्दा आपल्या उक्ती आणि कृतीतून दाखवून दिली. त्याचबरोबर इतर सर्व धर्मांच्या सन्मानाप्रित्यर्थ मोठे योगदान देऊन मानवता धर्माचे आचरण केले. उत्तम आणि आदर्श प्रशासक म्हणून त्यांची एक ख्याती होती. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणारेच होते. एवढेच नाही तर रोजगाराच्या निर्माण कार्यातही त्यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.

देशातील मंदिरांचे विकास असेल किंवा नदीकाठच्या घाटांचा पुनर्विकासाला प्राधान्य देऊन अहिल्यादेवी होळकरांनी या देशाची संस्कृती, परंपरा आणि मूल्य जोपासण्याच्या केलेल्या ऐतिहासिक कार्याचा वारसा हा आपल्या सर्वांनाच अभिमानास्पद असा आहे. नव्या पिढीला या इतिहासाची जाणीव करून देण्याच्यादृष्टीने जिल्ह्याच्या भूमिमध्ये त्यांचे स्मारक उभे राहणे हे आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचे होडगर म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून होडगर यांनी सांगितले, की या स्मारकाची संकल्पना यापूर्वीच कार्यान्वित होण्याची गरज होती.

परंतु आता मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाचा तयार होत असलेला आराखडा खूपच अभ्यासपूर्ण असा आहे. या स्मारकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची संपूर्ण वाटचाल, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केंद्र, अध्यासन केंद्र या बरोबरीनेच एक चांगले असे पर्यटनस्थळ जिल्ह्याच्या भूमीमध्ये उभे राहत असल्याचा निश्चितच आनंद आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ हे जिल्ह्यातीलच असल्यामुळे या उभ्या राहणार्‍या स्मारकामुळे जिल्ह्याची नवी ओळखही निर्माण होईल. प्रामुख्याने हे स्मारक उभारताना मंत्री विखे पाटील यांनी महिलांचे सक्षमीकरण ही संकल्पना घेतली आहे. हे स्मारक त्यादृष्टीने अधिक प्रेरणादायी ठरेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने महिलांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टी या राष्ट्रीय स्तरावरील स्मारकातून अधिकच आधोरेखीत होणार असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाची ओळख ही निश्चित वेगळेपण दाखवून देणारी ठरेल, असा विश्वासही होडगर यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Kopargaon : पश्चिमेचे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याबाबत चालढकल थांबवा

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून अरबी समुद्रात वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळवण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची उदासीनता आता न्यायालयाच्या रडारवर आली आहे....