अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शहरातील शनी चौक परिसरातील गुजर गल्लीमध्ये पहाटे गौरव विनायक कुलकर्णी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन कारना आग लावून त्या पूर्णतः जाळून खाक करण्यात आल्या. हा प्रकार अपघाती नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
गुरूवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास गौरव कुलकर्णी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या दोन चारचाकी वाहनांना आग लावण्यात आली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत दोन्ही वाहने पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, शुक्रवारी पुन्हा पहाटे त्यांच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या सलग घडणार्या घटनांमुळे कुलकर्णी कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये तीन संशयित व्यक्ती वाहनांच्या परिसरात संशयास्पद हालचाली करताना स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे हा प्रकार नियोजनबध्द कटाचा भाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
घटनेची गंभीर दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी कुलकर्णी कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला तसेच पोलीस प्रशासनाशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.




