अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय दाखल्यांसह विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील 1 हजार 384 ग्रामपंचायतीमध्ये 2 हजार 345, तर 12 पालिका व एका छावणी क्षेत्रासाठी 54 आणि महानगरपालिका क्षेत्रात 31 असे 2 हजार 430 नवीन आपले सरकार सेवा केंद्रांना मान्यता दिली आहे. लवकर या ठिकाणी सेवा केंद्र मंजूर झालेल्या ठिकाणी युझर आयडी देण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या धोरणानुसार यापूर्वी महा-ई- सेवा केंद्रातून तसेच सेतू सेंटरमधून नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय दाखल्यांसह विविध शासकीय सेवा उपलब्ध देण्यात येत होत्या. याच धरतीवर ग्रामपंचायतीसह पालिका क्षेत्रात शासकीय विभागाच्या योजना आणि दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात अडीच हजार नवीन आपले सरकार सेवा केंद्रांना मान्यता आली असून महाआयडीकडून स्वतंत्र युजर आयडी देण्यात येणार आहे.
सध्या जिल्ह्यातील 595 ग्रामपंचायतीमध्ये आपलं सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. या केंद्रातून नागरिकांना जन्म, मृत्यूसह अन्य 38 प्रकारचे दाखले देण्यात येतात. मात्र आता आणखी केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचे शहर किंवा तालुक्याच्या ठिकाणचे हेलपाटे कमी होण्यास मदत होणार आहे. साधारण पुढील काही दिवसांत ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आपले सेवा केंद्र मंजूर झालेल्या ठिकाणी नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती विचारात घेऊन सेवा केंद्रांना आयडी प्रदान करण्याची प्रक्रिया होणार आहे.




