अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कडाक्याची थंडी पडत असून अनेक ठिकाणी किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याचे भारतीय हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंगळवार दि.9 ते 11 डिसेंबर या कालावधीत थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात थंडीची तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे.
दरम्यान, मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात कमाली थंडी जाणवली. सायंकाळी सहानंतर अनेक ठिकाणी थंडीत वाढ झाल्याचे दिसून आले. हवामान विभागाने पुढील दोन दिवस थंडीच्या अर्लट दिल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात काल जेऊर (करमाळा) येथे 6 अंश, यवतमाळ 9 अंश आणि गोंदिया या ठिकाणी 8.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती नागपूर 8.8 अंश, भंडारा 9 अंश, वाशिम 10.8 अंश, डहाणू 15.5 अंश असे तापमान होते. तर एकांकी किमान तापमान अहिल्यानगर 7.4 तापमान, नाशिक 9.3 अंश, पुणे 8.9 अंश, नांदेड 9.7 अंश अशा तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
पुढील 11 दिवस थंडीचेच
मंगळवारपासून पुढील 11 दिवस म्हणजे मार्गशीर्ष दर्शवेळ आमावस्येपर्यंत महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवणार आहे. यात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागात रात्री थंडीची लाट किंवा लाटसदृश्य स्थितीचा तर दिवसा थंड दिवसामुळे हूडहुडीचा अनुभव येऊ शकतो. या कालावधीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
गहू, हरभराला पोषक
यंदा मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या लांबल्या. त्यानंतर आता जिल्ह्यात दुसर्या टप्प्यातील कडाक्याची थंडी पडत असून पुढील काही दिवस ही थंडी कायम राहणार आहे. यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील गहू, हरभरा पिकांना ही थंडी पोषक राहणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.




