अहिल्यानगर । ज्ञानेश दुधाडे
आशिया खंडात नंबर वन अशी ओळख सांगण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत साखर कारखानदारांना सांभाळणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेत देखील आता कापर्पोरेट लूकचे वारे संचारले आहेत. यामुळे यापूर्वी या ठिकाणी सुरू असणाऱ्या साध्या, पारदर्शी कारभारासोबत बँकेच्या मुख्यालयाचे रुपडे पालटण्यात आले आहेत.
यामुळे बँकेत आता नुसता लखलखाट दिसत असून मुंबई-पुण्यातील आयटी कंपनीच्या कार्पोरेट लूकप्रमाणे जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील दालनं सजवण्यात आलेली आहेत. बँकेच्या या लखलखणाऱ्या नूतनीकरणाचे आज शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते साध्या पद्धतीने लोकार्पण करण्यात येणार आहे. बँकेचे हे बदलेले रूप पाहिल्यावर जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांना भाऊ, ही शेतकऱ्यांची बँक बरका अशी सांगण्याची वेळ येवू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नगर जिल्हा बँकेच्या वाटचालीचा प्रवास हा तसा मोठा. १९५७ साली स्थापन झालेल्या या बँकेचे कामकाज १९५७ ते १९६३ या कालावधीत माणिक चौकातील देवीचावाडा (आताच्या टाऊन शाखा) या ठिकाणी सुरू होती. १ मे १९५८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि सहकार मंत्री बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते बँकेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर बँकेने स्व मालकीची इमारत विकत घेत आताच्या जागेवर १९६३ साली ४ लाख २० हजार रुपये खर्च करून भव्यदिव्य इमारत बांधली.
त्या काळात बँकेच्या या इमारतीत असणारी लिफ्ट पाहण्यासाठी नगरशह आणि परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहली येत होत्या. १९६३ नंतर अनेक वर्षे बँकेच्या इमारतीसह लिफ्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहलीचा हा उपक्रम सुरू होता. त्यावेळी या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री स. का. पाटील यांच्या हस्ते झाले. जिल्हा बँकेने १९६३ साली बांधलेली ही इमारत आजही दिमाखात उभी असून याच इमारतीत बसून जिल्ह्याच्या शेती, अर्थकारण, सहकार आणि साखर कारखानदारीशी संबंधीत अनेक महत्वपूर्ण निर्णय त्या वेळीच्या बँकेच्या लोकप्रतिनिधींनी घेतले.
जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामधेनू असणाऱ्या या जिल्हा बँकेची वाटचाल आता आधूनिकतेच्या दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र, बँकेची केवळ इमारत भव्य नको, तर या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, त्यांची आर्थिक प्रगतीला उपयोगी ठरतील असे निर्णय होणे अपेक्षीत आहे.
अन्यथा जिल्हा बँक प्रशासन आणि संचालक मंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून बँकेच्या मुख्यालयात केलेला हा झगमगाट आणि लखलखाट हा केवळ देखावा ठरू नयेत, अशी अपेक्षा जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. बँकेच्या संचालक मंडळाने नव्याने केलेल्या नुतनीकरणासाठी १० कोटी रुपये मंजूर केले होते. यातील आतापर्यंत किती खर्च झाले याचा हिशोब अजून बँकेच्या प्रशासाने जुळवलेला दिसत नाही. बँकेच्या या नुकनीकरणाचे मात्र आज साध्या पध्दतीने उद्घाटन करण्यात येतणार आहे असे बँकेकडून आवर्जुन सांगण्यात आले.
नुतनीकरण आणि विखे पाटील
तत्कालीन चेअरमन असतांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी बँकेचा चेहरा बदलण्याचे काम केले. त्यावेळी त्यांनी बँकेच्या इमारतीचा आकर्षक लूक तयार करून घेतला तसेच काही मजल्यावर दुरूस्ती करून घेतली. बँकेची इमारत ही खऱ्या अर्थाने विखे पाटील चेअरमन असतांना झाली. तर १९७८ साली सहकार सभागृहाच्या जोड इमारतीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर काही वर्षापूर्वीच या सहभागृहाचे नुतणीकरण करण्यात आलेले आहे.
६३ वर्षाचा योगायोग
जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील या इमारतीचे बांधकाम १९९३ साली करण्यात आले होते. त्यावेळी ४ लाख २० हजार रुपयांत है काम करण्यात आले. त्यावेळी जिल्ह्यातील पहिले लिफ्ट या ठिकाणी बसवण्यात आली होती. त्यानंतर आशिया खंडात संगणकाचा वापर करणारी पहिली बैंक म्हणून जिल्हा बँकेची ओळख निर्माण झाली. त्यानंतर आज बरोबर ६३ वर्षांनी म्हणजेच २०२६ साली पुन्हा जिल्हा बँकेच्या मुख्यालयाचे कार्पोट पध्दतीने नुतनीकरण करण्यात आलेले आहे.
बँकेचे अनेक महत्वपूर्ण निर्णय
जिल्हा बँकेत ३४ ते ३५ वर्षापूर्वी तत्कालीन अध्यक्ष मारूतराव घुले पाटील यांनी दूरदृष्टी ठेवत भविष्यात शेती करण्यासाठी मजूरांचा प्रश्न निर्माण होणार असल्याने त्यावेळी जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी कर्जपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच बँकेच्या माध्यमातून उपसा जलसिंचन योजनेचे काम हाती घेण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील हरीत क्रांतीला जिल्हा बँकेची मदतच झाली. तसेच दुधाळ जनावरांना कर्ज पुरवठा करत जिल्ह्यात धवल क्रांतीचे श्रेय जिल्हा बँकेला आहे.
२४ चेअरमन आणि १० एमडी
जिल्हा बँकेने स्थापनेपासून मोतीभाऊ फिरोदीया, भाऊसाहेब थोरात, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, मारूतराव घुले, यशवंतराव गडाख, राधाकृष्ण विखे पाटील, का. मि. रोहमारे, आबासाहेब निंबाळकर, शंकरराव गडाख, शिवाजीराव कर्डिले, पांडूरंग अभंग, सीताराम पाटील गायकर, बाजीराव खेमनर, रावसाहेब साबळे आणि आता चंद्रशेखर घुले पाटील अशा २४ नेत्यांना बँकेत चेअरमन तर जी. के. पाटील ते रावसाहेब वर्षे अशा १० जणांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.





