मुंबई | Mumbai
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुक (Loksabha Election) प्रचारावेळी भिवंडीतील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी (RSS) एक वादग्रस्त विधान केले होते. महात्मा गांधी यांची हत्या आणि आरएसएस यांच्या संबंधित ही टिप्पणी होती. त्याविरोधात संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. यानंतर आज (शनिवारी) त्या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी हजर झाले. त्यानंतर भिवंडी कोर्टाने गांधी यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.
मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींचे यापूर्वी काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर जामीनदार होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने नवीन जामीनदार द्यावा लागणार होता. त्यासाठी राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर झाले होते. यानंतर त्यांचे नवीन जामीनदार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ झाले आहेत. सकाळी ११ च्या सुमारास भिंवडी कोर्टात ही सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव भिवंडी कोर्ट परिसरात पोलीसांकडून कसून तपासणी करण्यात आली.
भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे
राहुल गांधी यांना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुलुंड चेक नाका येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र, यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत रोखले. तर खबरदारी म्हणून न्यायालयाच्या १०० मीटर परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली. सुनावणीनंतर राहुल गांधी पुन्हा रस्त्याने मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. भिवंडी कोर्टातून बाहेर पडल्यानंतर राहुल गांधी यांचा ताफा भिवंडी शहरातून बाहेर पडत असताना भिवंडी शहरातील नागरिकांना हात दाखवत अभिवादन केले. काल दिल्लीत एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले होते.





