अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या दोन महिन्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पूर परिस्थिती होती. झालेल्या नुकसानीतून वर येत असतानाच जिल्ह्यात 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा पावसाच्या इशारा देण्यात आल्याने शेतकरी वैतागला आहे. दरम्यान, या इशार्याने शेतकरी सतर्क झाला असून उरले सुरले पीक वाचविण्यासाठी धावपळ करीत आहे.
देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यभरात अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 22 ऑक्टोबर पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वार्यांसह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 21 ऑक्टोबरपासून पुढील 5 दिवस वादळी वार्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे.
यंदा थंडीविना दिवाळी
दरवर्षी दिवाळीआधी थंडीची चाहुल लागते. पण यंदा ऑक्टोबर हिट सुरू आहे. कमाल तापमान अनेक ठिकाणी 30-31 अंश सेल्सिअस आहे. थंडीची खरी चाहुल लागण्यासाठी कमाल तापमान खाली येणे गरजेचे असते. पण यावर्षी तसे दिसत नाही. शिवाय पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नगर, अकोले, श्रीरामपुरात पावसाची आतषबाजी
परतीच्या पावसाने आधीच नकोनको केलेले असताना पुन्हा नगर जिल्ह्याला तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास नगर शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी अर्धा ते पाऊणतास धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे ऐनवेळी मोक्याच्या क्षणाला पाऊस सुरू झाल्यानं खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेल्या नागरिकांची तसेच दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे फटाका व्यावसायिकांची देखील चांगलीच धावपळ उडाली. अकोलेतही सायंकाळी, तर श्रीरामपुरात रा 11.30 वा.पाऊस झाला.




