Sunday, August 30, 2026
Homeनगरजिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९७ कोटी रुपये वर्ग - ना....

जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९७ कोटी रुपये वर्ग – ना. विखे पाटील

अहिल्यानगर । प्रतिनिधी

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला असून, कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ होऊन पहिल्या टप्प्यात जिल्ह्मातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६९७.८१ कोटी रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दूरदृष्य प्रणाली द्वारे झालेल्या कर्ज वितरण शुभारंभास मंत्री विखे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे सहभागी झाले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील 72 हजार 559 शेतकऱ्यांच्या खात्यात 697 कोटी 81 लाख 25 हजार 139 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील शेतकरी हा राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. मात्र, अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे काही वेळेस पिकांचे नुकसान होते. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती.

त्यानुसार जिल्ह्यातील 72 हजार 559 शेतकऱ्यांच्या खात्यात 697 कोटी 81 लाख 25 हजार 139 रुपयांचा लाभ देण्यात आला. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली. यात अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 65 हजार 656 शेतकरी सभासदांना 622 कोटी 74 लाख रुपये एवढ्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तसेच अन्य राष्ट्रीयकृत बँकांमधील सहा हजार 903 शेतकरी सभासदांना 75 कोटी 07 लाख 25 हजार 139 रुपये रकमेच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळेल. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनीही आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या योजनेत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 33 हजार 711 शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 1 लाख 32 हजार 591 पात्र शेतकऱ्यांच्या समावेश आहे. त्यापैकी 1 लाख 15 हजार 692 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. 8 हजार 363 शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढावा तसेच जे मयत खातेदार आहेत अशा खात्यांच्या बाबतीत त्यांच्या वारसाने विकास संस्थेकडे, बँकेकडे वारसाची नोंद लावून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : तडीपारांचा नाशिकमध्ये मुक्काम; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गणेशोत्सवाच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक पोलीस (Nashik Police) ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या...