अहिल्यानगर (प्रतिनिधी)
नालेगाव येथे लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्थेत स्वस्त दरात प्लॉट मिळवून देण्याच्या आमिषाने गोरगरिबांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रकाश भुमय्या कोटा (रा. बालाजी सोसायटी, अहिल्यानगर- कल्याण रस्ता, अहिल्यानगर) याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायालयाने त्याला 30 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर, या गुन्ह्यातील दुसरा संशयित पोलीस अंमलदार अशोक बाळु पुंड (रा. साई गजानन कॉलनी, लेखानगर, सावेडी, अहिल्यानगर) हा पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी सांगितले.
फसवणूकीसंदर्भात 12 जून रोजी कैलास नामपेल्ली उषाकोयल (वय 61, रा. झारेकर गली, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. उषाकोयल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांची प्रकाश कोटा व अशोक पुंड यांच्यासोबत पूर्वीपासून ओळख असून, मैत्रीच्या नात्याचा गैरफायदा घेत 2011 साली दोघांनी लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापनेचे आमिष दाखवले.
गरिबांसाठी 500 चौ.फुटांचे प्लॉट कमी किमतीत देण्याचे आश्वासन दिले आणि शासकीय प्रक्रियेअंती प्लॉट मिळतील, असे सांगत विश्वास संपादन केला. उषाकोयल कुटुंबीयांनी एकूण 3 लाख रूपये व त्यांच्या ओळखीचे लक्ष्मण श्रीगादी यांनी 3 लाख रूपये, तर उषाकोयल यांची बहीण शशीकला मिठापेल्ली हिने 1 लाख 25 हजार रूपये रोख स्वरूपात दिले होते.
मात्र, रक्कम घेऊन बराच काळ उलटला तरी कोटा व पुंड यांनी प्लॉटचा ताबा दिला नाही. उषाकोयल यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची कोतवाली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. सुमारे 100 पेक्षा जास्त लोकांचे यामध्ये पैसे गुंतले असून त्यांना प्लॉट मिळालेला नाही.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर कोटा व पुंड यांना पोलिसांनी अटक केली नव्हती. कोटा हा अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथे असल्याची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, पुंड हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
गुन्हा दाखल झालेला अशोक पुंड हा जिल्हा पोलीस दलात नोकरीला आहे. सध्या त्याची नियुक्ती येथील आर्थिक गुन्हे शाखेत आहे. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच तो सुट्टीवर गेला. नंतर तो हजर झाला नाही. त्याच्यावर गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल होऊन देखील त्याला अद्याप निलंबित केले नसल्याची माहिती आहे. पोलीस त्याला कधी अटक करणार असा प्रश्नही फसवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे.




