अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महानगरपालिकेसह राज्यातील ड वर्गात असलेल्या 19 महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश नगर विकास विभागाने मंगळवारी सायंकाळी जारी केले आहेत. प्रभाग रचना करताना सन 2011 मध्ये झालेल्या जनगणनेची लोकसंख्या गृहीत धरली जाणार असल्याने हद्द वाढ झालेल्या महानगरपालिका वगळता इतर महापालिकांमध्ये प्रभागांची व नगरसेवकांची संख्या कायम राहणार आहे. प्रत्येक प्रभागात चार सदस्य असणार आहेत. या निवडणुकीसाठी चार प्रभाग राहणार असून याबाबत प्रभाग रचनेच्या आदेश स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान राज्यातील 19 महानगर पालिकांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकासाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. आता लवकर जिल्हा परिषद व पंचायत समित्यासाठी प्रभाग रचनेची शक्यता आहे. प्रभागांची संख्या ठरविताना शक्यतोवर सर्व प्रभाग चार सदस्यांचे केले जाणार आहेत. सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग 3 अथवा 5 सदस्यांचा होईल अथवा दोन प्रभाग 3 सदस्यांचे होतील. 3 अथवा 5 सदस्यांचे प्रभाग कोणत्या क्षेत्रात राहतील, हे भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीने प्रभाग रचना करताना नागरिकांची गैरसोय टाळता येईल अशा ठिकाणी ठेवण्यात यावेत. अशी परिस्थिती नसल्यास शेवटचे प्रभाग 3 किंवा 5 सदस्यांचे राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रभाग रचना करताना महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या भागिले महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार एका प्रभागात समाविष्ट करावयाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाणार आहे. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त या मर्यादेत ठेवता येईल. प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात केली जाणार आहे. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत प्रभाग रचनेचा शेवट महानगरपालिका क्षेत्राच्या दक्षिण दिशेला केला जाणार आहे. प्रभागांना क्रमांकही त्याच पध्दतीने दिले जाणार आहेत.