अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे. महानगरपालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 8 जानेवारी ते 31 जानेवारी अखेरपर्यंत मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये 100 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच 1 ते 28 फेब्रुवारी अखेरपर्यंत 75 टक्के, तर 1 ते 22 मार्च अखेर 50 टक्के सवलत दिली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेने कराच्या थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात येत आहेत. बहुतांश प्रकरणे लोक आदालतमध्ये घेऊन त्यात तडजोड करून मोठ्या प्रमाणात वसुली केलेली आहे. मागील तीन-चार वर्षांत महानगरपालिकेने लोक अदालतच्या माध्यमातून सुमारे 35 कोटी रुपयांची वसुली केली आहे. यंदा मार्च महिन्यामध्ये लोकअदालत होणार आहे. मात्र, तत्पूर्वी थकबाकीदारांना संधी देण्याच्यादृष्टीने व महानगरपालिकेची जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी शास्तीमध्ये तीन टप्प्यात सवलत जाहीर करण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत मालमत्ता कराचा भरणा 31 जानेवारी अखेर केल्यास त्यांना शास्तीमध्ये 100 टक्के सवलत मिळणार आहे.
त्यानंतर 28 फेब्रुवारी अखेरपर्यंत कर भरणार्याना शास्तीमध्ये 75 टक्के व 1 ते 22 मार्च अखेर कर भरणार्यांना शास्तीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व थकीत कराचा भरणा करावा. महानगरपालिका जप्ती कारवाई सुरू करणार असून कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी लवकरात लवकर कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी केले आहे.