अहिल्यानगर (प्रतिनिधी)
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आज १८ एप्रिलपासून उन्हाळी सुट्टीपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरतील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी शुक्रवार दि. १७ रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला होता. त्यानंतर उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हा आदेश दिला असून, शाळांनी व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित निर्णयाची माहिती सर्व मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी परीक्षेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सकाळी ७ ते १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहणे आवश्यक राहील.
गेल्या आठ दिवसांपासून नगर शहर जिल्ह्यातील पारा हा ४१ अंशाच्या पुढे सरकला आहे. सकाळी दहानंतर उन्हाचा चटका वाढला असून सायंकाळी पाचनंतर देखील उन्ह चटक आहे. विशेष करून सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उन्हाची तीव्र अधिक असून नगर शहरात दुपारच्या वेळी शुकशुकाट असल्याचे स्थिती निर्माण होत आहे. उन्हामुळे सर्वांची लाहीलाही होतांना दिसत आहे.





