Thursday, April 30, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar Passes Away : अजित पवारांसोबत विमानात नेमकं कोण कोण होतं?...

Ajit Pawar Passes Away : अजित पवारांसोबत विमानात नेमकं कोण कोण होतं? नावे आली समोर

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह विमानावरील सर्व ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे सध्या राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर होते. आज त्यांच्या बारामतीमध्ये चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या नियोजित दौऱ्यासाठी त्यांनी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून विमानाने उड्डाण केले. सकाळी ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे ‘क्रॅश लँडिंग’ झाले. हा अपघात इतका भीषण होता की विमानातील कोणालाही वाचवता आले नाही.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण सहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, ते ‘लिअरजेट-४५’ (Learjet-45) हे प्रसिद्ध व्यावसायिक जेट होते.

बॉम्बार्डियर कंपनीने बनवलेले हे विमान सुरक्षित मानले जाते, मात्र आज लँडिंगच्या वेळी नशिबाने साथ दिली नाही. सकाळी ९ वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेने संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. अजित पवारांच्या निधनाची बातमी बारामतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण शहरात सन्नाटा पसरला. बारामतीचा विकास आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारे ‘लाडके दादा’ हरपल्याने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी आणि जनतेने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अजित पवार हे त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेल्या थेट संपर्कासाठी ओळखले जात होते. प्रशासनावर त्यांची असलेली जबरदस्त पकड आणि राज्याच्या विकासासाठी घेतलेले कठोर निर्णय यामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक धडाडीचा आणि कार्यक्षम लोकनेता गमावला आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झाले असून, विमान अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : ट्रॅफिक पार्कचा अपमृत्यू

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकमध्ये आणखी एका चांगल्या उपक्रमाचा अपमृत्यू होऊ घातला आहे. निओ मेट्रो व आयटी पार्क या महायुतीच्याच...