Friday, July 24, 2026
HomeराजकीयAjit Pawar Passes Away : अजित पवारांच्या निधानाने पंतप्रधान नरेंद्र मोदीही हळहळले;...

Ajit Pawar Passes Away : अजित पवारांच्या निधानाने पंतप्रधान नरेंद्र मोदीही हळहळले; म्हणाले…

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानावरील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून राजकीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून एका खाजगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला तांत्रिक बिघाडामुळे भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाने जमिनीला धडकताच पेट घेतला. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये त्यांचे अंगरक्षक आणि वैमानिकांचा समावेश असल्याचे समजते.

अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर अजित पवारांसोबतचे फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “अजित पवार हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेले एक कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र सन्मान होता. प्रशासकीय बाबींवरील त्यांची पकड आणि गरीब-दलितांच्या सक्षमीकरणाची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी होती. त्यांचे असे अचानक जाणे धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विटरच्या (X) माध्यमातून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून मला खूप धक्का बसला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी समर्पित केले. त्यांना सर्वजण प्रेमाने ‘दादा’ म्हणत. लोकांच्या कल्याणासाठी असलेली त्यांची निष्ठा सदैव स्मरणात राहील.”

अजित पवारांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या बारामतीतील निवासस्थानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीने आणि धडाडीच्या निर्णयांमुळे प्रशासनावर एक वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक अनुभवी आणि कार्यक्षम नेता गमावला आहे. या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संपूर्ण राज्य आज एका महान नेत्याच्या जाण्याने सुन्न झाले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...