नवी दिल्ली | New Delhi
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचे दि.२८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या विमान अपघातावर शंका उपस्थित करत हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे. विरोधी पक्षांनी अजित दादांच्या अपघाती निधनाबद्दल संसदेत आवाज उठवावा यासाठी ते दिल्लीत जाऊन बड्या नेत्यांच्या भेटगाठी घेत आहेत. आज (सोमवारी) त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यादव यांच्याकडे काही कागदपत्रे सुपूर्द करत अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणी संसदेत आवाज उठवावा, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत व्हीएसआर कंपनीबाबत काही प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या.
यावेळी ते म्हणाले की, अजितदादांच्या विमान अपघातावेळी (Ajit Pawar Plane Crash) दृश्य मानता केवळ सुमारे तीन हजार फूट होती. सामान्यतः पाच हजार फुटांपेक्षा कमी दृश्य मानता असताना विमान उड्डाण करण्यास कॅप्टन टाळतात. मात्र अशा परिस्थितीतही व्ही. के. सिंग यांनी कॅप्टन कपूर यांना विमान उडवण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला. हे मी जे बोलत आहे त्याचा पुरावा म्हणजे कंपनीचा मालक सिंगचे सीडीआर काढून त्यात काय संभाषण झालं ते तपासता येऊ शकते. कपूर हा पायलट होता अपघाताच्या दिवशी त्यांच्या रक्तात कुठेही ड्रग्स, दारू , विषंही नव्हतं. काही दारू न पिता सुद्धा, त्याने जे केलं ते का केलं असेल, त्याच्या खोलात जावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले. तसेच त्याच्यावर काही दबाव होता का? किंवा व्ही. के. सिंग यांना वाचवलं जात आहे का? असा सवाल सर्वांच्या मनात असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनाही काही थेट प्रश्न विचारले. ते म्हणाले की, “व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग यांच्या राजस्थानमध्ये झालेल्या विवाह सोहळ्याला प्रफुल्ल पटेल उपस्थित होते का? जर ते गेले असतील, तर त्या लग्नाला इतर कोणते नेते उपस्थित होते आणि ते कोणत्या पक्षाचे होते, याची माहिती महाराष्ट्रासमोर मांडावी. तुम्ही स्वार्थी आहात की अजित दादा प्रेमी हे महाराष्ट्राला (Maharashtra) दाखवून द्या. याबाबत तुम्ही पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडाल अशी अपेक्षा आहे असेही रोहित पवारांनी म्हटले. दरम्यान, रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे व्हीएसआर कंपनीचे मालक आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग यांच्या विवाह सोहळ्यात नेमके कोणते राजकीय नेते उपस्थित होते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकी कोणती माहिती समोर येते हे बघणे महत्वाचे असणार आहे.




