मुंबई | Mumbai
सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. तसेच काही विधेयके देखील पारित करण्यात येत आहे. अशातच आता राज्य सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाणारी नाहक बदनामी आणि ‘फेक अकाउंट्स’चा सुळसुळाट रोखण्यासाठी कंबर कसली आहे.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केली असून, अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच ‘ॲक्शन मोड’वर येणार आहे.
भाजप आमदार राहुल कुल यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सोशल मीडियावरील बदनामीचा मुद्दा मांडताना “सोशल मीडियावर कोणाचीही बदनामी करण्यासाठी सध्या एक मोठी यंत्रणा कार्यरत आहे. अनेक फेक अकाउंट्सच्या माध्यमातून लोकांची प्रतिमा मलीन केली जाते. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.हे अभिव्यक्ती जपण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण फेक अकाउंटद्वारे बदनामी थांबवण्यासाठी सरकार काही कायदा करणार आहे का, असे म्हटले.
त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. ही समिती सध्याच्या कायद्यात सुधारणा करायची की नवा स्वतंत्र कायदा आणायचा, याचा सखोल अभ्यास करून सरकारला शिफारस करेल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.




