मुंबई । Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचा तपास एका खासगी गुप्तहेर संस्थेमार्फत (Private Detective Agency) करून घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचे विमान कोसळले होते. या भीषण स्फोटात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून बारामतीवर शोककळा पसरली आहे. मात्र, या अपघाताला काही दिवस उलटल्यानंतर आता हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन या घटनेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी राजधानीतील दोन मोठ्या खासगी गुप्तहेर संस्थांच्या प्रप्रमुखांची भेट घेतली आहे. सरकारी तपास यंत्रणांच्या कामाच्या गतीवर आणि निष्कर्षांवर रोहित पवार यांनी अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी एका सक्षम संस्थेकडे या अपघाताच्या सखोल तपासाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी अपघाताशी संबंधित सर्व तांत्रिक माहिती आणि घटनाक्रम या संस्थांकडे सोपवल्याचे समजते.
रोहित पवार यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील काही संशयास्पद बाबी मांडल्या होत्या. त्यांनी प्रामुख्याने मुख्य वैमानिक कॅप्टन कपूर यांच्या चौकशीची मागणी केली आहे. वैमानिकावर कोणताही मानसिक किंवा आर्थिक दबाव होता का? तसेच विमान कंपनीच्या ‘व्हॉट्सॲप ग्रुप’मधील चॅट्स डिलीट करण्यात आले आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खराब हवामान आणि दृश्यमानता (Visibility) कमी असतानाही विमानाचे टेक-ऑफ आणि लँडिंग का झाले, असा कळीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी नुकतेच एक ट्विट करून आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. “स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी !” असं रोहित पवार यांनी म्हंटल आहे.





