श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
आकाश दुबैय्या हत्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही. संबंध सिद्ध झाल्यास गुन्हा दाखल करावा; अन्यथा खोटे आरोप करणार्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी पत्रकार परिषदेत दिला. आकाश दुबैय्या हत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार हेमंत ओगले यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
सागर बेग म्हणाले, या घटनेनंतर सर्वप्रथम शेखर दुबैय्या यांनी आपल्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली होती. त्यानंतर आपण तातडीने संबंधित पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, या प्रकरणात दुबैय्या कुटुंबावर आपले नाव घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमदार हेमंत ओगले यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करत, आका असल्याचा दावा केला जात असेल, तर संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर करावे, अशी मागणी बेग यांनी केली. याशिवाय सरस्वती कॉलनीतील पोलीस कारवाई, शहर बंद आंदोलन आणि स्थानिक राजकारणाशी संबंधित काही मुद्द्यांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. माध्यमांनी कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी वस्तुस्थितीची शहानिशा करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.




