अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोनामुळे महापालिकेतील तीन कर्मचार्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना सरकारने 50 लाखांची मदत जाहीर केली आहे.
मात्र या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना मदत मिळून द्यावी, अशी मागणी अधिकारी व कर्मचारी समन्वय समितीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली आहे.
भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की करोना महामारीमुळे मनपाचे तीन कर्मचारी दगावले आहेत. शासनाने करोना काळात कर्मचारी मयत झाल्यास 50 लाखांची मदत जाहीर केलीली आहे. परंतु अद्यापपर्यंत आपल्या मयत सहकारी कर्मचार्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही. राज्यात अनेक ‘ड’ वर्ग महापालिकेतील कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. आपल्या महापालिकेत अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही.
सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची एकरकमी रक्कम दिवाळीपर्यंत मिळावी, कर्मचार्यांना नियमानुसार पदोन्नती मिळावी. सर्व कर्मचार्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान मिळावे. दिवाळी सणासाठी शासन निर्णयानुसार अग्रीम मिळावी. परिविक्षाधीन कालावधी संपलेल्या कर्मचार्यांना कायम आदेश देण्यात यावेत, अशी मागणी कर्मचार्यांच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.