मुंबई | Mumbai
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेल्या महिनाभरात बीडमधील परिस्थितीवर सातत्याने भाष्य केलेय. पोलीस यंत्रणेपासून हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या तपासाबाबतही अंजली दमानिया यांनी अनेक दावे केले होते. आता त्याहीपलिकडे जाऊन त्यांनी वेगळा आरोप केला आहे. होटल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे?, असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. त्या पुढे म्हणाल्या, मला अशी माहिती मिळतेय की डॉ.अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत. यांची चौकशी व्हायला हवी. अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, “त्यांनीच संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन केले. वाल्मिक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. ११ रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले. हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन झाले आहे”, असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय.
अंजली दमानिया यांचा अजित पवारांना सवाल
अंजली दमानिया म्हणाल्या, अजित पवार, काय चालू आहे तुमच्या पक्षात? दिवसा ढवळ्या तुमच्या पक्षाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण केली आणि अजून कारवाई नाही? बीड जिल्ह्यात असणारे सर्वत्र महाराष्ट्रात हे चालू आहे, राजकारणाच्या जीवावर दादागिरी. हा पुरावा बास का आणि पुरावे पाहिजे गुन्हा दाखल करायला ? काय एक्शन घेणार तुम्ही ? तुम्ही पुण्याचे पालक मंत्री आहात आणि बीडचे देखील आहात. तुमच्या नेत्यांची ही गुंडगिरी बंद करा.
“सर्व गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे जामीन. आता त्यासाठी मेडिकल ग्राऊंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयूमध्ये अॅडमिट केल्याचं दाखवलंय. त्याला काहीही झालं नाहीय. खंडणी मागताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना. अशा लोकांना कोणतीही दया माया न दाखवता त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत, त्याचे अहवाल सार्वजनिक करा. ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत. दोन तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून ते ठणठणीत असल्याची खात्री करून त्यांना ऑर्थर रोड तुरुंगात हलवण्याची माझी मागणी आहे”, असे काल अंजली दमानिया म्हणाल्या होत्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा