Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : आत्महत्या हाच एक पर्याय ?

आरोग्यदूत : आत्महत्या हाच एक पर्याय ?

आजच सकाळी ऑफिसला जाताना एका पुलावर प्रचंड ट्रॅफिक लागली. कारण काय म्हणून तिथे उभे असलेल्या एका पोलिसांना मी विचारले, एवढी गर्दी कसली? त्यांनी सांगितले, एकाने पुलावरून उडी मारली. का? कोणामुळे? काहीच पत्ता नाही. इतकेच नव्हे तर त्याच्या घरच्यांचा पण शोध चालू होता. असे खूप प्रसंग तुम्ही पण ऐकले किंवा पाहिले असतील.

आत्महत्या म्हणजे नेमके काय? तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्वतःचा जीव संपवायचा. पण का हा टोकाचा निर्णय घ्यायचा? खूप जणांकडून आपण ऐकतो की ‘आयुष्य खूप सुंदर आहे’. तसे जर असेल तर असे नकारात्मक विचार मनात येण्याची शक्यता कमीच.आत्महत्या करणे बरोबर की चुकीचे याबद्दल प्रत्येकाने वैयक्तिक विचार करावा. काही धर्मांमध्ये स्वनाश करणे निषिद्ध किंवा पाप मानले गेले आहे.
या सगळ्या गोष्टीचा जरा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, त्रास, दुःख, कंटाळा, संताप हा संपूर्ण आयुष्याचा नसून एखाद्या घटनेचा असतो. एखादी त्रासदायक घटना जिला आपण संबंध आयुष्य समजून बसतो. जसे की नोकरी जाणे, घटस्फोट होणे, मोठा आजार होणे, परीक्षेत अपयश येणे, लैंगिक अत्याचार होणे, एखाद्या व्यक्तीकडून आपण फसले जाणे, इ.

- Advertisement -

जे मनोरुग्ण असतात त्यांच्यामध्ये मूड डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, सबस्टन्स अब्युज डिसऑर्डर, बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर, पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर या मुळे स्वनाशाचे विचार येण्याचा संभव असतो.

भारतात 2019 मध्ये आत्महत्येचा आकडा हा 230,314 पर्यंत वाढला आहे, ज्यात विद्यार्थ्यांचा आकडा हा 100,000 पैकी 16.5 इतका आहे. ज्यांच्याकडून आपण एका उज्ज्वल भारताची अपेक्षा करीत आहोत, ते असे पाऊल उचलत आहेत ही खेददायक गोष्ट आहे. महिलांपेक्षा पुरुषांचे आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.

खरे तर मला जगायचे नाही किंवा मला मरायचे आहे या विचारामागे – मला कोणावर ओझे बनून राहयाचे नाही. मला ही परिस्थिती भोगायची नाही. मी जिवंत आहे नाही याचा कोणालाही फरक पडत नाही मला आयुष्यामध्ये ब्रेक पाहिजे मला आयुष्यात अडकल्यासारखे झालेय माझी पुढे काहीच प्रगती नाही आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाही, हे विचार असू शकतात.

जो वर एक मुद्दा मांडला होता की, ही कृती फक्त ‘एका घटनेचा’ परिणाम असतो. जर ही समस्या प्राथमिक पातळीवरच सोडवली गेली तर कदाचित माणूस विचारांपासून परावृत्त होऊ शकेल. आपण कित्येक महान लोकांची चरित्र वाचतो. व्यक्ती कितीही महान असो, पण सगळ्या अडचणींमधून वाट काढून पुढे जायचे आणि हार बिलकुल मानायची नाही हाच सगळ्यांचा निश्चय.
एखादी घटना आत्ता आपल्याला जितकी त्रासदायक किंवा भीतीदायक वाटते, तिची तीव्रता (ळपींशपीळीूं) काही काळाने कमी झालेली असू शकते, करण ‘वेळ’ हे प्रत्येक गोष्टीवरच औषध आहे. त्यावेळेस आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की ‘खरेच हे मौल्यवान आयुष्य संपवण्याइतके काही आहे का? अजून काही पर्यायांचा जर मी विचार केला तर प्रश्न नाही का सुटू शकणार?’ अशा प्रकारचे स्वभाष्य (ीशश्रषींरश्रज्ञ) आपण करू शकतो. या सेल्फ टॉक मधून आपण स्वतःचे सामर्थ्य-उणीवा, पोझिटिव्हीटी-निगेटिव्हीटी ओळखू शकतो. स्वतःमधली निगेटिव्हीटी कमी करून पोझिटिव्हीटी अजून वाढवू शकतो. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर आपल्यातला गुंता आपणच सोडवायचा. हे सेल्फ टॉक आपण बदलू पण शकतो. जसे की,आयुष्याला काहीच अर्थ नाही आयुष्याला अर्थ देणे हे माझ्या हातात आहे, कोणत्याही व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या नाही. मला अपयश आले-एकदा अपयश आले म्हणजे कधीच यश येणार नाही असे नाही. मी माझे प्रयत्न अजून वाढवीन.

कोणीच मला समजून घेत नाही. प्रत्येकाने माझ्या म्हणण्यानुसार वागावे असे नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचे ठरवण्याचा अधिकार आहे. पण मी मात्र त्यांना उपयोगी पडण्याचा प्रयत्न करेल. आयुष्यात पुढे सगळा काळोख दिसतोय, काहीच वाट सापडत नाहीये. काय करू? जेव्हा अगदी काळोख होतो तेव्हा सूर्याचा पहिला किरण पडायची वेळ झालेली असते. मी स्वतःवरचा विश्वास अजून वाढवीन आणि कोणत्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल.

जर सेल्फ टॉक करायला कठीण जात असेल, तर परिवारातील लोकांची, मित्र-मैत्रिणींची, शिक्षकांची, तसेच मानसोपचारतज्ञांची मदत घेणे यात काहीच चुकीचे नाही. योग्य व्यक्तीकडून मदत मिळाली तर त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. याच बरोबरीने शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे, हे पण उपयुक्त ठरू शकते. जसे की योगा-प्राणायाम करणे, मॉर्निंग वॉक करणे, आहार व्यवस्थित घेणे, जे कार्य करून आपल्याला आनंद होतो ते कार्य करणे जसे की संगीत ऐकणे, चित्र काढणे, कुठले डेकोरेशन करणे हे देखील उपयोगी ठरू शकते.

या परिस्थितीत अजून एक उपाय आपण करू शकतो तो म्हणजे ‘परिवाराचा विचार’, मग तो आपल्या पालकांचा असो, जोडीदाराचा असो, किंवा मुलांचा असो. आपण आयुष्यातून ‘पळ’ काढल्याने त्यांची परिस्थिती काय होईल याचा विचार करता येईल.तसेच आपल्या आजूबाजूला जर अशा प्रकारचे विचार करणार्‍या व्यक्ती दिसल्यात तर त्यांना आपण मदत करू शकतो. पण या विचारांची माणसे ओळखायची कशी? उत्तर अगदी सोपे आहे. ज्यांनी या आधी आत्महत्येचा प्रयत्न केला असेल, सारखे मरणाबद्दल कल्पना करणे किंवा तसे बोलून पण दाखवणे, व्यसन करत असतील तर ते एकदम जास्ती होणे, एकट्यात राहणे, झोप एकदम कमी होणे, जेवण एकदम कमी होणे, रूटीन पूर्ण बदलून घेणे, कायम नकारात्मक बोलणे, जसे की, काहीच होऊ नाही शकत, काहीच अर्थ नाही, काहीच उपयोग नाही, इ. अशा व्यक्ती दिसल्यास आपण त्यांच्याशी बोलू शकतो आहोत, त्यांची परिस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करू शकतो, त्यांचा घरातील व्यक्तींशी या बद्दल बोलू शकतो, किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला त्यांना प्रोत्साहित करू शकतो.

‘तो’ एक नकारात्मक क्षण आणि त्या ‘एका’ क्षणाचे नकारात्मक विचार जर आपण बदलू किंवा पुढे ढकलू शकलो तर पुढील आयुष्याचे चित्र कदाचित परिपूर्ण बदललेले ही असू शकेल. करण धपाटे बसल्याशिवाय आणि भाजून निघाल्याशिवाय तर मडके पण पक्क होत नाही. मग हे तर माणसाचे जीवन आहे. या चांगल्या-वाईट अनुभवातून माणूस शिकून पुढे जात असतो. कोणत्याही वाईट परिस्थितींना दुःख समाजण्यापेक्षा तक्रारी समजल्या तर त्यांना तोंड द्यायला आपल्याला सोप जाऊ शकते. करण दुःख आपण सहन करतो नि तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करतो. तक्रारी सोडवून सुटल्या तर पुढचे टोकाचे विचार येणारच नाही. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, आयुष्य सुंदर आहे, ते जगायला की संपवायला!

- Advertisment -

ताज्या बातम्या