मुंबई | Mumbai
भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला (Ashok Kharat) अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्याची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असून, ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत.त्यामुळे खरातचे आर्थिक व्यवहारही तपास संस्थांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान, अशोक खरातसोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे देखील फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच मंत्री आदिती तटकरे यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.
सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेत म्हटले की, “रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची बहीण प्रतिभा चाकणकर म्हणतात की त्यांच्या सह्या बनावट आहेत. पण त्यांना पुढे करून रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? समता पतसंस्थेतील खाती बनावट आहेत असं जर म्हणायचं असेल तर त्याचे संचालक बनावट आहेत का? प्रतीभा चाकणकर यांना नोटीस (Notice) आली नव्हती, तर मग त्या पोलिसांना भेटायला का गेल्या होत्या? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच खरात प्रकरणात (Kharat Case) रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी, यासाठी मंत्री तटकरे यांनी काय केले आहे. आदिती तटकरे यांनी नेत्यांची भाटगिरी करणे, मी किती हुशार हे करणे थांबवले पाहिजे. महिला बालविकास मंत्री म्हणून तटकरे यांनी चाकणकर यांच्या अटकेसाठी काय पाठपुरावा केला आहे? सुनेत्रा पवार आणि आदिती तटकरे या प्रकरणी कधी बोलणार आहेत? या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी काय जबाबदारी पार पाडली? निवडणुकांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही महिलांची सुरक्षा आहे. त्यासाठी तुम्ही काय करत आहात? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
शिंदे-केसरकरांना चौकशीला कधी बोलावणार?
अशोक खरात प्रकरणात समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जर ते खरे असतील तर दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलावणार? रुपाली चाकणकर या गजाआड कधी करणार? या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
खरातच्या घरावर बुलडोझर कधी फिरवणार?
सुषमा अंधारे यांनी अमरावतीत आरोपीच्या घरावर लगेच बुलडोझर फिरवला. ही कारवाई योग्यच आहे. पण खरातच्या घरावर बुलडोझर का फिरवला जात नाही? आज महिना झाला तरी साधी कारवाई केली जात नाही. हा फार्महाऊस का आम्हाला बघायला ठेवला आहे का? असा सवाल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.




