मुंबई | प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी दिल्या जाणाऱ्या अधिकृत ओळखपत्रावरील अशोकस्तंभाची राजमुद्रा यावर्षी गायब झाली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्याच दिवशी नव्या वादाला तोंड फुटले. पुढील काही दिवसात हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनासाठी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्यावतीने पत्रकार, टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी, कॅमेरामन, पोलिस, कंत्राटी कामगार, विविध सेवा पुरवणारे कर्मचारी, भेट देणारे अभ्यंगत यांना विधानभवनात प्रवेश करण्यासाठी अधिकृत ओळखपत्र दिले जाते. या ओळखपत्रावर संबंधिताचे छायाचित्र आणि विधानमंडळ सचिवालयाचा स्टॅम्प असतो. तसेच या ओळखपत्राच्या मध्यभागी अशोकस्तंभाची राजमुद्रा असते.
पण पावसाळी अधिवेशासाठी वितरित करण्यात आलेल्या ओळखपत्रावरून अशोकस्तंभाची राजमुद्रा आणि त्याखाली असलेले ‘सत्यमेव जयते’ हे शब्द यंदा गायब झाले आहेत. आतापर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनाच्या ओळखपत्राच्या मध्यभागी अशोकस्तंभ विराजमान झालेला होता. पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात प्रथमच अशोकस्तंभ गायब झाला आहे. विधानसभेचे कामकाज सुरु होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. आता कामकाजाच्या पुढील काही दिवसात ओळखपत्रावरील अशोकस्तंभाचा मुद्दा सभागृहात उपस्थित होण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





