मुंबई | Mumbai
आशिया चषक क्रिकेट (Asia Cup 2025) स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज सामना रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने येणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेची सुरुवात विजयाने केली असल्यामुळे हा सामना काँटे की टक्कर ठरेल, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावतील.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत आणि पाकिस्तानचे संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यात भारतीय संघाचे (Team India) नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध त्याचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तान संघाची (Pakistan Team) धुरा सलमान अली आघाच्या खांद्यावर आहे. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून दणदणीत मिळवून दमदार विजय स्पर्धेत पदार्पण केले आहे.
या सामन्यात अभिषेक शर्मा, शुभमन गिल, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. याच विजयाची (Won) लय पाकिस्तानविरुद्धही कायम राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. संघाची फलंदाजीची जबाबदारी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, जितेश शर्मा, रिंकू सिंग यांच्यावर असेल. अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे हे प्रभावी पर्याय आहेत. तर गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानने ही ओमानविरुद्ध ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. शाहिन आफ्रिदी, सईम आयुब, सुफियान मुकीम, फाहीम अश्रफ आणि मोहम्मद हॅरिस यांनी पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. फलंदाजीमध्ये मोहम्मद हॅरिस, साहिबजादा फखर जमान, हसन नवाझ, अली आघा, फाहीम अश्रफ, मोहम्मद नवाझ, हुसेन तलाट फरहान आणि सईम आयुब यांसारखे खेळाडू पाकिस्तानकडे आहेत. अष्टपैलूंमध्ये सलमान
आणि खुशदील शहा हे पर्याय उपलब्ध आहेत. गोलंदाजीत हसन अली, हॅरिस रौफ, सलमान मिर्झा, शाहिन आफ्रिदी आणि सुफियान मुकीम यांच्यावर जबाबदारी असेल. या सामन्यात दोन्ही संघांकडून चुरशीची लढत अपेक्षित आहे आणि क्रिकेट चाहत्यांना एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळेल अशी आशा आहे.
भारताचे वर्चस्व
टी-२० क्रिकेटमधील दोन्ही संघांमधील आकडेवारी पाहिली असता भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. आतापर्यंत झालेल्या १३ सामन्यांपैकी भारताने १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर पाकिस्तानला केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्येही भारताने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. तसेच दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरही भारताची कामगिरी सरस आहे. येथे झालेल्या १० सामन्यांपैकी भारताने सहा तर पाकिस्तानने चार सामने जिंकले आहेत.





