मुंबई | Mumbai
राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बळीजाराजाविषयी असंवेदनशील वक्तव्य केल्यानंतर आता राज्याचे विद्यमान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाबासाहेब पाटील यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहकार मंत्रीपदाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये एका जाहीर सभेमध्ये बोलताना बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जामाफीच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानाने वादात सापडले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, अशा आशयाचे विधान बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. तसेच, निवडून यायचे असते म्हणून आम्ही आश्वासने देत असतो, असेही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन यावरुन वादंग निर्माण झाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी तातडीने आपल्या वक्तव्याविषयी सपशेल दिलगिरी व्यक्त केली. माझे कर्जमाफीविषयीचे वक्तव्य दूध उत्पादनासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला अनुसरुन होते, असे स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी दिले.
बाबासाहेब पाटलांकडून दिलगीरी व्यक्त
वादग्रस्त विधानाबद्दल बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले, “मी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे बँकेच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था बळकट करायची असेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल, तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळसारखी व्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यामुळे दिवसाला पैसे येतात.”
“माझ्याही मतदारसंघात पतसंस्था आहे. आम्ही देखील दुधाच्या व्यवसायासाठी पैसे दिलेले आहेत. या बँकेतून जे कर्ज देणार आहोत, त्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही असे मी त्या ठिकाणी बोललो होतो. मी सुद्धा शेतकरी आहे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असा खुलासा बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले होते बाबासाहेब पाटील?
लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं आहे, तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचंय. एखाद्या गावात निवडणुकीच्या काळात अनिल भाईदाससारखा माणूस गेला , लोकांनी सांगितलं आमच्या गावात नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागावं ठरवावं ना.. अनिल भाईदास म्हणाले, नदीही देऊन टाकू.. म्हणून म्हणतो मागणाऱ्यांनी काय मागावं हे ठरवावं..निवडणुकी आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्हीही देखील आश्वासने देतो. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





