नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशात पार पडलेल्या १३ व्या संसदीय निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. या निवडणुकीच्या माध्यमाने बांगलादेश नॅशनल पार्टीचे प्रमुख तारीक रहमान यांनी देसाच्या राजकारणात जबरदस्त पुनरागमन केले आहे. अनौपचारिक आकडेवारीनुसार, बीएनपीने २९९ पैकी २०८ हून अधिक जागा जिंकत ‘मॅजिक फिगर’ ओलांडली आहे. या विजयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निर्वासित असलेले तारिक रहमान आता बांगलादेशच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
बीएनपी मीडिया सेलचे सदस्य शायरुल कबीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत निकालांमध्ये तारिक यांनी दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे. ढाका-१७ मतदारसंघात तारीक रहमान यांनी जमात-ए-इस्लामीच्या एस.एम. खालिकुज्जमान यांचा पराभव केला. रहमान यांना ६०,२१५ मते मिळाली, तर प्रतिस्पर्ध्याला केवळ २४,५२४ मते मिळवता आली.
यावेळी केवळ संसदेसाठीच नव्हे, तर देशाच्या नवीन संविधानावर जनमत चाचणी देखील घेण्यात आली. सुरुवातीच्या कलानुसार, ७२.९% जनतेने या नव्या संविधानाला आणि सुधारणांना पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या कार्यकाळाची मर्यादा द्विगृही संसद आणि महिलांना वाढीव प्रतिनिधित्व यांसारख्या ३० महत्त्वाच्या बदलांचा समावेश आहे.
महत्वचे म्हणजे, २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनानंतर आणि शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शेख हसीना यांचा ‘आवामी लीग’ पक्ष मैदाना बाहेर होता. यामुळे मुख्य लढत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यातच बघायला मिळाली. एकूण २९९ जागांवर मतदान झाले. एकाच्या मृत्यूमुळे एक जागा रद्द करण्यात आली होती. २९९ जागांपैकी बीएनपी ५० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, तर जमात १८ जागांवर पुढे आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे ४८ टक्के एवढा राहिला.
जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या युतीला ६८ जागा मिळाल्या आहेत. मात्र, काही मतदारसंघांत गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. ढाका-१३ मतदारसंघातील उमेदवार मौलाना ममनुल हक यांनी मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. बॅलेट पेपरच्या सदोष रचनेमुळे आपली हजारो मते रद्द झाल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे तारिक रहमान यांचे अभिनंदन करताना त्यांनी म्हटले आहे की,”संसदीय निवडणुकीत बीएनपीला मिळालेला निर्णायक विजय हा बांगलादेशच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. या यशाबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो.” पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले की, भारत एका लोकशाहीवादी, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. उभय देशांमधील सामायिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि प्रादेशिक शांततेसाठी भारत नवीन सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले.




