सिन्नर | प्रतिनिधी Sinnar
शहर व तालुक्याच्या काही भागात आज (दि. २) दुपारी २.३० व सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह काही भागात वार्यासह गारांही पडल्या. त्यात शेतातील शेतमालासह फळझाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दुपारी ४.३० च्या दरम्यान चासच्या बालाजी मंदिरावर वीज कोसळून त्यात मंदिराचा पूर्ण कळस कोसळला. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागात बेमोसमी पाऊस पडत आहे. आज पुन्हा या पावंसाने हजेरी लावली आहे. त्यामूळे नागरीकांची धावपळ झाली. तालुक्यातील नांदूरशिंगोटे, दोडी, डुबेरे, पाडळी, ठाणगाव, वडगाव-सिन्नर, शिवडे, दातलीसह परिसरातील अनेक गावांना आज पावसाने पून्हा झोडपून काढले. सुमारे दिड-दोन तासाहूनही अधिक आलेल्या पावसामूळे सर्वच भागात पाणी वाहतांना बघायला मिळत होते.
या पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये शेतकर्यांचा कांदा गारांनी झोडपला आहे. तर गव्हाचे उभे पिक शेतातच आडवे झाले आहे. त्यात आज पुन्हा पाऊस झाल्याने हा कांद्यासह शेतमाल सडण्याची भीती शेतकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तर काही भागात काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.




