भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर)
उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग-व्यवसायास वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने धरणाकडे नवीन पाण्याची आवक वाढली आहे.
त्यामुळे अंदाजानुसार ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल पहाटेच या धरणातील साठा २५ टक्के झाला होता. नंतरही आवक सुरूच असल्याने हे धरण सायंकाळी २६ टक्के भरले होते. रात्री जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे आज शुक्रवारी या धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर जाणार आहे. संपलेल्या ३६ तासांत नव्याने २७६ दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे काल रात्री पाणीसाठा २८८४ दलघफूवर पोहचला होता.
दरम्यान, हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित भागात पाऊस सुरू असल्याने मुळा नदीचा प्रवाह काहीसा वाढला असून हे पाणी पिंपळगाव खांड या धरणात येत आहे. ६०० दलघफू क्षमतच्या या धरणात आवक होत असल्याने कोणत्याही क्षणी आंबित पाठोपाठ हेही धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता असून ओव्हरफ्लोचे पाणी आज मुळा धरणाकडे झेपावणार आहे.
गत आठ दिवसांपासून पाणलोटात मान्सून सक्रिय झाल्याने कमी अधिक पाऊस कोसळत आहे. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे सक्रिय झाले आहेत. डोंगररांगा धुक्याने लेपाटून गेल्या आहेत. हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात भर टाकू लागले आहे. हेच खुललेले सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना आता हा परिसर खुणवू लागला आहे.
पाऊस कोसळत असल्याने गारवा वाढल्याने पाणलोटात काही ठिकाणी धुण्या पेटू लागल्या आहेत. पावसामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. काल सकाळपर्यंत नोंदवला गेलेला पाऊस असा मिमीमध्ये भंडारदरा २०, निळवंडे ५, रतनवाडी ३३, घाटघर ७७, पांजरे ३४, वाकी १६.




