अकोले |प्रतिनिधी| Akole
नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांच्या परिसरात तुडूंब भरलेल्या जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी जवळपास सुमारे एक हजार कापडी तंबू सज्ज झाले असून, नाताळापासून भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद परिसरात थंडीसोबत निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. तर 2024 या सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी भंडारदरा धरण, हरिश्चंद्रगड परिसरात पर्यटकांनी आतापासूनच मोठी गर्दी केली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी आपला मोर्चा पर्यटनस्थळांकडील हॉटेल, तंबूकडे (टेंंट) वळविला असून खाण्या-पिण्याचा बंदोबस्त होतो. तसेच हॉटेल खर्चाच्या निम्म्या खर्चात काम होत असल्याने अनेकांनी टेंटवाल्यांकडे (तंबू) जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. तर शहरातील तरुण तंबू व हॉटेलवर मनसोक्त आनंद घेण्याचा बेत आखताना दिसत आहे. यंदा डिसेंबरमध्ये धरण तुडूंब भरलेले असल्याने धरणाच्या कडेला ऐन थंडीत तंबू हे यंदाचे खास नवे आकर्षण आहे. भंडारदरा जलाशयाभोवती 45 किलोमीटरचा रिंगरोड असून या परिसरात धरणाच्या काठावर आदिवासी युवकांनी पर्यटकांच्या निवासासाठी कापडी तंबू उभारले आहेत. भंडारदरा-शेंडी येथील पर्यटन विकास महामंडळाचे लेक व्ह्यू, आनंदवन, यश, अमित, अमृत व्हिला आदींसह सर्व रिसॉर्ट, हॉटेल व शासकीय विश्रामगृहे गर्दीने ओसंडल्याने पर्यटकांसाठी स्थानिक युवकांनी वन्यजीव व आदिवासी विभागाच्या मदतीने मिळालेल्या कापडी तंबूंच्या साहाय्याने तात्पुरती निवास व्यवस्था केली आहे.
मुरशेत, पांजरे-उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल या भागांतील शेकडो आदिवासी तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे येथील हजारो तरुणाईला रोजगार उपलब्ध झाला आहे. साधारणपणे प्रतिव्यक्ती 1000 ते 1500 रुपयांपर्यंत एक दिवसाचा खर्च पर्यटकांकडून घेतला जातो. चहा, नाश्ता, दोनवेळचे जेवण, शेकोटी, बोटफेरी अशा सुविधा दिल्या जातात. तुडूंब भरलेल्या जलाशयानजीक हे तंबू लावलेले असून पाण्याच्या निळाईत शेकोटीची धग निवळताना दिसते. साम्रद परिसरात आशिया खंडातील दोन नंबरची सांदण दरी, शिखरस्वामिनी कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, आज्या पर्वत, अलंग-मलंग-कुलंग गड, घनचक्कर, करंडा, खुंटा, कात्राईची खिंड आदी गड, डोंगर असून येथे सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक व गिर्यारोहकांची मांदियाळी आहे. मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर भागातील पर्यटक तुलनेने जास्त आहे.
एक दिवसाच्या कौटुंबिक सहली पण मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावताना दिसत आहेत. भंडारदरा धरणाच्या स्पिल वे, सांडवा गेटजवळ पाण्याच्या कडेला पर्यटकांना कॅम्पिंगचा आनंद मिळावा म्हणून जवळपास 200 तंबू लावण्यात आले आहेत. येथे सतत वाहतुकीची कोंडी अनुभवास येत असून, पर्यटक व वाहनांच्या गर्दीने हा परिसर फुलला आहे. तर भंडारदरा, हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात पर्यटकांनी आनंद द्विगुणित करताना अभयारण्य परिसरात वावरताना वननियमांचे पालन कारणे आवश्यक आहे. अभयारण्य परिसरात जाण्यास मुतखेल व शेंडी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी होणार आहे. वनक्षेत्रात दारू पिऊन धिंगाणा घालणार्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी सांगितले.
टेन्ट कॅम्पिंग, हॉटेल, होम स्टेमध्ये येणार्या सर्व पर्यटकांची आधारकार्डासह नोंद रजिस्टरमध्ये घेणे अनिवार्य असेल. अभयारण्य क्षेत्रातील वन्यजीवांना त्रास होईल अशा मोठ्या डेकोरेशन लाईटचा वापर करण्यास पूर्णतः बंदी असेल. डीजे व तत्सम मोठ्या आवाजातील ध्वनीयंत्रास पूर्णतः बंदी असेल. फटाके वाजविण्यास पूर्णतः बंदी असेल. आपल्याकडे येणार्या पर्यटकांना रात्री जंगल क्षेत्रात फिरण्यास ही बंदी असेल. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करुन सहकार्य करावे.
– अनिल पवार (सहायक वनसंरक्षक-नाशिक)