लोणी |वार्ताहर| Loni
उन्हाची वाढती तीव्रता आणि लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली टंचाई विचारात घेवून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भंडारदरा धरणातून बिगरसिंचनाचे आवर्तन तातडीने सुरू करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात येणारे संगमनेर राहाता श्रीरामपूर तालुक्यातील बहुतांशी गावात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. गावपातळीवरील पाण्याचे स्रोत कमी पडल्याने तसेच नदीकाठच्या गावात पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामपंचायतीला पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. हीच परिस्थिती नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातही निर्माण झाली. उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाण्याची मागणी सर्वच तालुक्यातून होत होती.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकांची गरज लक्षात घेवून तातडीने बिगरसिंचनाचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचे योग्य नियोजन करून आवर्तन तातडीने सुरू करताना शेवटच्या गावाला पाणी मिळेल याची दक्षता अधिकार्यांनी घ्यावी. पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी गावातील अधिकार्यांनी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बिगरसिंचन आवर्तनाचा लाभ संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आणि शहरी भागातील नागरिकांना होईल.




