मुंबई | Mumbai
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार झालेले वाल्मिक कराड आज (दि.३१ डिसेंबर) रोजी पुण्यातील सीआयडीच्या (Pune CID) कार्यालयात शरण आले. मात्र, यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शंका उपस्थित करत नवा दावा केला आहे.
यावेळी बोलतांना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले की,” वाल्मिक कराड स्वतःहून शरणागती येतो, इतका दिवस तो पोलिस आणि सीआयडीला सापडत नव्हता, सर्व काही संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची काल सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली. तिथे या दोघांमध्ये प्रदीर्घ, अशी चर्चा झाली. कालची ही चर्चा आणि आज वाल्मिक कराड याचे शरण येणे म्हणजे, हे घडवलेले नाट्य तर नाही ना?” असा प्रश्न आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “वाल्मिक कराड हा बीड (Beed) प्रकरणातील महत्त्वाचा संशयित गुन्हेगार आहे. जी काही घटना घडली त्याचा कर्ता-करविता वाल्मिक कराड आहे, असे संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करून सांगत आहे.आमच्या पोलीस खात्याचे नाव खूप मोठे आहे. पण, नाव मोठे आणि लक्षण खोटे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात पोलीस खात्याची झाली आहे. वाल्मिक कराडला शोधण्याकरता पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हान केली आणि पुण्यात स्वतः वाल्मिक कराड शरण येतो,पण पोलिसांच्या हाताला लागत नाही किंवा आजच तो शरण झाला यावरही शंका उपस्थित व्हायला निश्चितपणे जागा आहे”, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले.
दरम्यान, शरण येण्याआधी वाल्मिक कराड यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता.त्यामध्ये त्यांनी म्हटले की, “मी वाल्मिक कराड आहे. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची (Extortion) खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण येत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे”, असे ते म्हणाले होते.