मुंबई | Mumbai
विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी एकप्रकारे ऑपरेशन टायगर ३.० सुरू केले असून त्याची सुरवात सचिन अहिर यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीच्या पदासाठी धक्कातंत्र वापरले असून उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू समजले जाणारे आमदार सचिन अहिर यांना उपसभापतीपदाची उमेदवारी दिली आहे. सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने उध्दव ठाकरे यांना एक प्रकारे मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी तीन दिवस फुटीर खासदारांच्या मतदार संघात दौरा केला. मात्र उद्धव ठाकरेंचा दौरा संपताच एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर ३.० राबवत त्यांना आणखी एक धक्का दिला आहे. विधन परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सचिन अहिर हे ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार असून त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्याने राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर ३.० ची सुरवात आहे का असे प्रश्न विचारण्यास सुरवात झाली आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते. त्यातील सचिन अहिर होते.
आगे आगे देखो होता है क्या
सचिन अहिर हे शिवसेनेत आले आहेत, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो, असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले. तसेच आगे आगे देखो होता है क्या…. असे म्हणत आगामी काळात अजूनही भूकंप होतील, असे सूचकपणे त्यांनी सांगितले.
काही माणसे कशी गद्दार
सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गट चांगलाच भडकला आहे. सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाला बंडखोरी म्हणतात की विकाऊ आमदार, असा संतप्त सवाल खासदार अरविंद सावंत यांनी विचारला. काही माणसे कशी गद्दार निघतायेत बघा…. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.




