नवी दिल्ली | New Delhi
मॅरेथॉन बैठकीनंतर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Election 2025) एनडीएचे (NDA) जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. यात भाजप आणि जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तर चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) पक्ष २९, उपेंद्र कुशवाह यांचा आरएलएम पक्ष ६ आणि जितन राम मांझी यांचा एचएएम पक्ष ६ जागा लढवणार आहे.
बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सोशल मीडियावर एनडीएच्या जागावाटपाची घो षणा केली. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए कुटुंबातील सर्व सदस्यांनी सौहार्दपूर्ण वातावरणात पर स्पर संमतीने जागावाटप पूर्ण केले आहे, असे सांगून तावडे यांनी घटक पक्षांना मिळालेल्या जागांची आकडेवारी जाहीर केली.
एनडीए जागावाटपाची घोषणा युतीतील नेत्यांनी सोशल मीडियावर केली आहे. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, आरएलएम प्रमुख उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्यासह इतर नेत्यांनी जागावाटपाबाबत सोशल मीडियावर माहिती दिली.
दरम्यान, सर्व मित्रपक्ष पुन्हा बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी दृढ आहेत, असे तावडे यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनीही प्रतिक्रिया दिली. बिहार तयार आहे. राज्यात पुन्हा एनडीए सरकार स्थापन होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप निवडणूक समिती बैठक
भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक येथील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीयमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नित्यानंद राय, सर्वानंद सोनोवाल आणि धर्मेंद्र प्रधान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री आणि बिहारचे सह-प्रभारी सीआर पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा, बिहारचे मंत्री मंगल पांडे आणि बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल बैठकीस उपस्थित होते.




