मुंबई । Mumbai
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याच प्रकरणातील आरोपी आणि संबंधित शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपने कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून संधी दिली आहे. या निर्णयामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर सामान्य नागरिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित प्रशासकीय इमारतीतील सभागृहात शुक्रवारी पहिली सभा पार पडली. या सभेत पाच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेनेचे (शिंदे गट) दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका सदस्याचा समावेश आहे. मात्र, भाजपने दिलेल्या दोन नावांपैकी तुषार आपटे यांच्या नावामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
कोण आहे तुषार आपटे?
तुषार आपटे हे बदलापूरमधील त्या शैक्षणिक संस्थेचे सचिव आहेत, जिथे दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाले होते. या घटनेनंतर राज्यभर आंदोलने झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला असला, तरी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. घटनेनंतर तुषार आपटे अनेक दिवस फरार होते. अखेर ४४ दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी त्यांना कर्जत येथून अटक केली होती. मात्र, अटकेनंतर अवघ्या ४८ तासांत त्यांना जामीन मंजूर झाला होता.
जामिनावर बाहेर आल्यानंतरही आपटे हे शैक्षणिक संस्थेत कार्यरत होते आणि नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपसाठी सक्रियपणे काम करत होते. अशा गंभीर प्रकरणातील आरोपीला थेट नगरपरिषदेत मानाचे पद दिल्याने भाजपच्या ‘नैतिकते’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ज्या घटनेने राज्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला, त्यातील एका आरोपीला राजकीय पुनर्वसन कशासाठी दिले जात आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माध्यमांनी विचारणा केली. त्यावर बोलताना त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “ज्यांनी चूक केली आहे, त्यांच्यावर योग्य आणि निष्पक्षपणे कारवाई होईल. याबाबत कोणालाही चिंता करण्याची गरज नाही, कायद्यानुसार जे काही असेल ती कारवाई केली जाईल,” असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. मात्र, आपटे यांच्या निवडीवर त्यांनी थेट भाष्य करणे टाळले.




