दिंडोरी तालुक्यातील काही कंपन्यांमध्ये अजूनही कामगारांना कामावर ठेवल्याचे उघड झाले असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाझरसाठी लागणाऱ्या 8 लाखाच्या बाटल्यांचा अवैध साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला आहे.
दिंडोरी तालुक्यातील काही मोठ्या कंपन्यांच्या आपसातील संघर्षातून दिंडोरी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या मागे कोणी बडा राजकीय व्यक्ती असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
दिंडोरी तालुक्यातील लाखामपूर येथील मेगाफाईन ,आर सी फर्टिलिझर ,हेक्सागोण तसेच कादवा म्हाळुंगी येथील सीग्राम कंपनी ,पालखेड येथील कॅप्सूल कंपनीत शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून उतपादन सुरू असल्याची चर्चा दिंडोरी तालुक्यात होती.
पण जबाबदार अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कंपन्या बंद असल्याचे सांगितले. काही कंपन्यांमध्ये कामगार असल्याचा दुजोरा दिला.
कंपनी बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तरीही कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर जास्त लागत असल्याने ते विकण्यासाठी लागणाऱ्या बाटल्या दिंडोरी तालुक्यात एका ठिकाणी बनवण्यात आल्या.
त्यासाठी कामगार कामावर आल्याची चर्चा होती. पण कोणताही पुरावा याबाबत मिळत नव्हता. दिंडोरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी जऊळके दिंडोरी येथे नवीन संचेती वेअरहाऊस येथे छापा टाकला.
मारुती इंडस्ट्रीज मध्ये पोलिसांना अवैध माल आढळून आला. पॅटसॅन हँड सॅनिटायझर 100 मिली च्या 5760 प्लास्टिक बाटल्या 120 खाकी बॉक्स मध्ये आढळून आल्या.
विशेष म्हणजे 2400 बाटल्या वर 135 रुपये इतकी लूटमार करणारी किंमत लिहिलेली असल्याचे निदर्शनास आले आहे. तर उर्वरित 3360 बाटल्या वर क्रमांक, किंमत किंवा उत्पादन तारीख याबाबतची माहिती मिळाली नसल्याचे समजते.
याशिवाय 200 लिटरचे दोन प्लास्टिक बॅरल मध्ये कच्चे सॅनिटायझर बनवण्याचे रसायन सापडले. सुमारे 7 लाख 92 हजार रुपयांचा माल पोलिस निरीक्षक अनिल बोरसे यांच्या पथकाने जप्त केला.
दिंडोरी पोलिसांनी नाशिक नवीन सिडकोतील अमित चंदाणी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पालखेड स्थित एक कंपनीतही उत्पादन सुरू असल्याची चर्चा आहे.
या कंपनीची गाडी कामगारांना घेऊन जाताना दिसत आहे.दिंडोरी तालुक्यातील दोन ते तीन कंपन्या बंद असल्याचे दाखवत असले तरी आत कामगार असल्याची चर्चा असून मध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नसल्याने संशय बळावला आहे.
औषध कंपनी दलाल कंपनी चालवू शकतात तर द्राक्षाचे नुकसान होत असताना पॅकिंग हाऊसवर कडक नजर का? असाही प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.




