राहाता |प्रतिनिधी| Rahata
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून विकसित भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प (Budget) असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या मंत्राचा समावेश आजच्या अर्थसंकल्पात असून, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प सर्वच घटकांच्या विकासाला संधी देणारा आहे. देशाच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीला मोठे प्रोत्साहन देण्यात आले आहे. देशातील 100 जिल्ह्यांमध्ये कृषी जिल्हा विकास योजना राबवली जाणार असून, पंतप्रधान अन्नधान्य योजना कमी उत्पादन असलेल्या जिल्ह्यांच्या कृषी विकासाला बळकटी देईल. डाळ, तेलबिया आणि कापूस उत्पादनाला प्रोत्साहन देतानाच कृषी क्षेत्रातून रोजगार निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्डवरील (Kisan Credit Card) कर्ज मर्यादा वाढविल्याने शेतकर्यांना मोठा आधार मिळणार आहे.
युवकांसाठी लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करताना ते म्हणाले, 5 कोटी लघुउद्योगांच्या निर्मितीमधून 7 कोटी रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्टार्टअप योजनेच्या कर्ज मर्यादेत 20 कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याने देशातील स्टार्टअप उद्योगांना अधिक गती मिळेल. मागास भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी 5 लाख महिलांना 2 कोटी रुपयांच्या कर्जयोजनेंतर्गत मदत मिळणार असून, त्याद्वारे कौशल्य विकासासोबतच महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मोठे पाऊल टाकता येईल. कर्करोगासह 36 जीवनावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी (Customs Duty) हटवल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने करदात्यांच्या मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. याबद्दल पालकमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरेल असे विखे पाटील म्हणाले. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे हा अर्थसंकल्प देशातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.