Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचा शिष्टमंडळात समावेश; मंत्री किरेन रिजिजूंचा उध्दव ठाकरेंना फोन

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचा शिष्टमंडळात समावेश; मंत्री किरेन रिजिजूंचा उध्दव ठाकरेंना फोन

मुंबई | Mumbai
ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी आणि पाकिस्तानकडून पसरवले जाणारे फेक नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी मोदी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून ऑपरेशन सिंदूरची माहिती महत्त्वाच्या देशांना दिली जाणार आहे. त्यासाठी, सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आले असून शिवसेना शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग झाला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून एकाही खासदाराचा सहभाग या शिष्टमंडळात करण्यात आला नव्हता. त्यावरुन, खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन सर्वपक्षीय शिष्टमंडळ संदर्भात माहिती दिली असून शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराचाही या शिष्टमंडळात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करुन ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. जागतिक पातळीवर पाकिस्तानकडून पसरवण्यात येणारे फेक नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती रिजिजू यांनी ठाकरेंना दिली. ठाकरेसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा शिष्टमंडळात समावेश करण्यात आलेला आहे. शिष्टमंडळ क्रमांक २ मध्ये त्यांचा समावेश असून याचे नेतृत्व भाजपच्या रविशंकर प्रसाद यांच्याकडे असेल. हे शिष्टमंडळ यूके, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क आणि युरोपियन युनियनचा दौरा करेल.

- Advertisement -

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत विशेषतः पाक-आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे तळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाई करणाऱ्या सशस्त्र दलांमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुटप्पी मत असू नये. पहलगामवरील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर/सुरक्षा यंत्रणेबद्दल आपले मत आहे आणि आम्ही आपल्या देशाच्या, आपल्या देशाच्या हितासाठी प्रश्न विचारत राहू. तथापि, पाकिस्तान आधारित दहशतवादाला एकाकी पाडण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे. आम्ही केंद्र सरकारला असेही कळवले आहे की या कारणासाठी आम्ही एकत्र असलो तरी, गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी या प्रतिनिधीमंडळांबद्दल पक्षांना चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा एक नियम पाळला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

किरण रिजिजू आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संवादाची माहिती शिवसेना उबाठाकडून देण्यात आलेली आहे. ‘हे शिष्टमंडळ दहशतवादविरोधातील भारताची भूमिका जगाला सांगेल. देशासाठी योग्य असलेल्या गोष्टी आम्ही या शिष्टमंडळाच्या माध्यमातून करु, याची ग्वाही आम्ही सरकारला दिलेली आहे. प्रियंका चतुर्वेदी शिष्टमंडळाचा भाग असतील,’ अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahuri : राहुरी येथे अंगणवाडी भरतीत ‘लाखांच्या व्यवहाराची’ चर्चा

0
उंबरे |वार्ताहर| Umbare राहुरी तालुक्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांकडून भरती करून देण्याच्या नावाखाली एक लाख रुपयांची मागणी होत असल्याची...