नागपूर | Nagpur
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याबाबत त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, माझ्या निर्णयामुळे नाराज झालेली एक शक्तिशाली आयात ‘लॉबी’ हे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. कच्च्या तेलाच्या आयातीमुळे जवळपास २२ लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. काही लोकांच्या व्यवसायांना या निर्णयाचा फटका बसला आणि ते रागाने बदनामी करू लागते असल्याचे गडकरींनी म्हंटले आहे.
रस्ते, टोलनाके यामध्यमातून गडकरींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर सोशल मीडियावर सुद्धा याविषयीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. वातावरण तापलेले असतानाच गडकरी यांनी विरोधकांना शिंगावर घेतले आहे. आपल्याविरोधात जाणीवपूर्वक मोहीम सुरु असल्याचा आरोप गडकरींनी केला आहे. त्यांनी नागपूरमधील सभेत यामागे कोण आहेत, त्याचे नावच घेत अखेर मौन सोडले आहे.
या आरोपांमागे असलेल्या लोकांबद्दल बोलताना, गडकरींनी स्पष्ट केले की, ज्यांचा व्यवसाय त्यांच्यामुळे अडचणीत आला आहे, अशा लोकांनीच आपल्याविरुद्ध ‘पेड न्यूज’ सुरू केली आहे. राजकारण हे कसे चालते, याबद्दल भाष्य करताना ते म्हणाले की, “राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष आणि अहंकाराचा खेळ आहे”. स्वतःची तुलना “फळ देणाऱ्या झाडाशी” करताना गडकरी म्हणाले, “मी अशा टीकेला उत्तर देत नाही कारण असे केल्याने बातम्या बनतात. लोक फळ असलेल्या झाडावर दगड फेकतात. याकडे दुर्लक्ष करणे चांगले.”
कोणत्याही प्रकारची खोटी कामं केली नाही
गडकरींनी आपली राजकीय प्रतिमा स्वच्छ असल्याचा पुनरूच्चार केला. “कच्च्या तेलाच्या आयातीतून देशातून सुमारे २२ लाख कोटी रुपये बाहेर जात होते. या निर्णयामुळे काही लोकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि ते संतप्त झाले त्यांनी आजपर्यंत कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून एक रुपयाही घेतला नाही. तसेच, खराब काम करणाऱ्या कंत्राटदारांची आपण कठोर चौकशी करतो त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आपल्याला घाबरतात. परिणामी, लोकांचाही आपल्या कामावर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. आपण कोणत्याही प्रकारची खोटी कामे केलेली नाहीत.
शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे हे धोरण
पुढे ते म्हणाले की, त्यांचे धोरण इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे आणि प्रदूषण कमी करणे यावर केंद्रित आहे. शेतमालापासून इथेनॉल तयार करण्याचे काम केले जात आहे. माझी इनोव्हा कार याच इथेनॉलवर धावते. आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे इंधन आयातीत निहित हितसंबंध असलेल्यांना थेट नुकसान झाले असा दावा त्यांनी केला.
मी कधीही कोणत्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतला नाही
गडकरी यांनी आरोपांना राजकारणाचा भाग ठरवत आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. “मी कधीही कोणत्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही, म्हणूनच ते माझ्यापासून घाबरतात. लोकांना सत्य माहिती आहे आणि यापूर्वीही मी अशा परिस्थितींचा सामना केलेला आहे,” असे गडकरी म्हणाले. विश्लेषकांच्या मते, सीआयएएन अॅग्रोची वाढ ही केवळ इथेनॉल विक्रीमुळेच नव्हे, तर नव्या व्यवसाय आणि इतर उत्पन्न स्रोतांमुळेही झाली आहे.
आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर…
टीका-टिप्पणी करणाऱ्यांच्या मानसिकतेवर बोट ठेवत ते म्हणाले, “आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल” या आशेपोटी लोक अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करतात. माझ्यावर खोट्या बातम्या लावून आरोप केले जातात.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




