सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – घटनेनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती झाल्यावर त्याला आमची काहीच हरकत नाही. परंतु 28 मेपर्यंत त्यांची नियुक्ती मुदत आहे. एवढ्या लवकर ठराव पास करण्याचं कारण नव्हतं. राज्यपाल त्यांचा अधिकार वापरतील. याबाबतीत भाजप नव्हे तर महाविकास आघाडीच राजकारण करीत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.
पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांची मुदत 28 मेपर्यंत आहे. तोपर्यंत त्यांच्या पदाला धोका नाही. असे असताना दोन महिने आधीच त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे करण्याची गरज काय होती असा प्रश्न उपस्थित करीत भाजपकडून त्यांच्या नियुक्तीला विरोध होण्याचे कारणच नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले.
28 मे पर्यंत उद्धव ठाकरेंना धोका नव्हता्. मग एवढी घाई का करण्यात आली, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना त्यांच्याकडे एकच विषय होता का, उद्धव ठाकरे यांना अनुपस्थित ठेवून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेला निर्णय अवैध आहे. आम्ही नाही, तर तुम्हीच राजकारण करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.




