नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यातील धरणसाठ्यांत गतवर्षीच्या तुलनेत मोठी तूट निर्माण झाली असून, यात गोदावरी खोऱ्यातील धरणसमूहात गतवर्षाच्या जून अखेरच्या तुलनेत तब्बल २६.६३ टक्के जलसाठ्याची तूट निर्माण झाली आहे. पालखेड समूहतील धरणांनी तळ गाठला ३६.१५ टक्के तूट दिसून येत आहे. तर गिरणा खोरे धरणसमूहात तब्बल ४१.८७ टक्के तूट दिसून येत आहे. त्यामुळेच जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर आता जुलै महिन्यात जिल्हावासीयांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी मान्सूनवर एल निनोचा प्रभाव दिसून येत असून, नाशिक शहर व जिल्ह्यात यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य गंगापूर धरणसमूहात गतवर्षाच्या तुलनेत तब्बल २६.६३ टक्के जलसाठ्याची तूट निर्माण झाली आहे. गतवर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस जून महिन्यातही कायम राहिल्याने गंगापूर धरणसमूहात सुमारे ६२.६६ टक्के जलसाठा होता. तुलनेत यावर्षी ३ जुलै अखेरपर्यंत केवळ ३६.०३ टक्के (२६.६३ टक्के तूट) जलसाठा उपलब्ध आहे. पालखेड धरण समूहात सुमारे ४८.७७ टक्के जलसाठा होता. तुलनेत यावर्षी ३ जुलै अखेरपर्यंत केवळ १२.६३ टक्के (३६.१५ टक्के तूट) जलसाठा उपलब्ध आहे.तर गिरणा खोरे धरणसमूहात सुमारे ४५.४९ टक्के जलसाठा होता. तुलनेत यावर्षी ३ जुलै अखेरपर्यंत अवघा ३.६२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. असा एकूण गंगापूर,पालखेड आणि गिरणा खोरे धरण समूहात सुमारे ४७.८६ टक्के जलसाठा होता. तुलनेत यावर्षी ३ जुलै अखेरपर्यंत केवळ १९.०४ टक्के (२८.१२ टक्के तूट) जलसाठा उपलब्ध आहे.
घाटमाथ्यावर मान्सूनचा प्रभाव
दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी अद्याप मान्सूनचा प्रभाव प्रामुख्याने घाटमाथ्यावरच दिसून येत आहे. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमध्ये दिलासादायक पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे या भागातील खरिपाच्या शेती कामानांही वेग आला आहे..




