मुंबई | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान पुढे ढकलले आहे. आता सुधारित कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर,सोलापूर, छत्रपती संभाजी नगर,धाराशिव, लातूर, परभणी या १२ जिल्हा परिषदा )आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होईल. तर मतमोजणी ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारीला होईल. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी याबाबतची घोषणा केली.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. दुखवट्यामुळे प्रचार करता ना आल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान पुढे ढकलण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणी दोन दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य सरकारने राज्यात २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील. आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील, अशी माहिती आयोगाने दिली आहे.




