अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक तसेच जिल्ह्यातील विभागांचे विभाग प्रमुख यांना बालविवाह विरोधात शपथ दिली. तसेच बालविवाह मुक्त अभियानात नगर जिल्हा देशात अव्वल ठरल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणातील अधिकार्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
27 नोव्हेंबर 2025 ते 8 मार्च 2026 दरम्यान शंभर दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान महिला व बालविकासमार्फत राबविले जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शाळा महाविद्यालयांमधून निबंध लेखन, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन कथाकथन, इत्यादी स्पर्धांमधून बालविवाह विरोधात जनजागृती करण्यात येत आहे.
तर दुसर्या टप्प्यात विवाह संबंधी काम करणारे विविध घटक मंडपवाले, बँडवाले, स्वयंपाकी, आचारी, केटरर्स, विविध धर्मांचे धर्मगुरू, मंगल कार्यालय चालक इत्यादींची बालविवाह विरोधात जागरूकता वाढवण्यात येत आहे.
तर अभियानाच्या तिसर्या टप्प्यात विविध लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन बालविवाह बाबत जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी विशेष ग्रामसभा घेऊन बालविवाह मुक्ती बाबत शपथ घेण्याची उपक्रम सर्वच ग्रामपंचायत मधून करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांचे विविध प्रभाग वार्ड स्तरावर बालविवाह विरोधी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून माननीय पालकमंत्री महोदय यांच्या समवेत जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांना व विविध विभागांच्या विभाग प्रमुखांना बालविवाह विरोधी शपथ घेण्यात आली. या अभियाना अंतर्गत शपथ व जनजागृती उपक्रमामध्ये उत्तम काम करणार्या ग्रामपंचायतींना पुरस्कृत केले जाणार आहे.
बालविवाह मुक्त अभियानामध्ये अहिल्यानगर जिल्हा देशात सातत्याने शपथ घेण्याच्या उपक्रमामध्ये तसेच जनजागृती या उपक्रमामध्ये क्रमांक एक वर आहे. शपथ घेण्याच्या उपक्रमामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने एक लक्ष नव्वद हजार लोकांनी शपथ घेऊन देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर देशात दुसर्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील मथुरा हा जिल्हा आहे. तसेच जनजागृती या उपक्रमामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने 22 हजार 500 उपक्रम घेऊन देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर देशात दुसर्या क्रमांकावर हरियाणा राज्यातील हिस्सार जिल्हा आहे. माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील सर्व विभागांना, शाळा, महाविद्यालयांना, प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनावेळी बालविवाह विरोधात शपथ घेऊन अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या शपथ घेण्याच्या कार्यक्रमावेळी आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रम पाचपुते, आ. अमोल खताळ, आ. किरण लहामटे, आ. आशुतोष काळे, आ. सत्यजित तांबे, आ. विठ्ठलराव लंघे उपस्थित होते.




