
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर-राहुरी तालुक्यातील नदीकाठच्या बेलापूर खुर्द, नर्सरी, केसापूर, अमळनेर, दवणगाव तसेच परिसरातील अन्य गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी फिरणारे ड्रोन, अज्ञात व्यक्तींची हालचाल आणि चोरांच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गावातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सुरक्षा रक्षक दल स्थापन करून रात्रभर गावात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी काही ठिकाणी घरांवर दगडफेक करणे, दरवाजे ठोठावणे तसेच संशयास्पद हालचाली आढळून आल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दिवसभर शेतमजुरी व शेतीची कामे करून रात्री जागरण करावे, लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गावातील तरुणांनी वॉर्ड निहाय विभागणी करून रात्रभर पहारा सुरू ठेवला आहे. वाडी-वस्त्यांवर गस्त घालण्यात येत असून त्यांच्या सतर्कतेमुळे अद्याप चोरीची कोणतीही घटना घडलेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी नियमित पेट्रोलिंग करावे, तसेच प्रत्येक गावात किमान एकदा तरी पोलीस व्हॅन फिरवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मेहेत्रे यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील एक चारचाकी वाहन रात्री साडेतीनच्या सुमारास आंबीवरून केसापूर मार्गे जात असताना सुरक्षा रक्षक दलाने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालक न थांबल्याने संशय अधिक वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी सायरन व्यवस्था उभारण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे आपत्कालीन संदेश देणे तसेच अफवा पसरू नयेत यासाठी मदत होईल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष रात्री संशयित व्यक्तींना पाहिल्याचा दावा केला असून पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रात्रीच्या लोडशेडींगने नागरिक त्रस्त
महावितरणने रात्रीचे लोडशेडिंग बंद करून ते दिवसा करावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. रात्री सुमारे 11 वाजता गेलेला वीजपुरवठा रात्री 2 वाजता सुरळीत झाला. याबाबत महावितरणकडे चौकशी केली असता लोडशेडिंग असल्याचे सांगण्यात आले.




