पुणे | प्रतिनिधी Pune
देशात जेव्हा जेव्हा आंदोलने झाली तेव्हा तेव्हा आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण आंदोलनाच्या माध्यमातूनच स्वतंत्र झालेलो आहोत. लोकतंत्र आंदोलनामुळे सुरू आहे. आम्हाला फेक म्हणण्यापेक्षा व्यक्त होत असलेल्या तरुणांचे म्हणणे समजून घ्यावे. मात्र हे सरकार त्याबाबत चर्चाच करत नाही, अशी माहिती ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिली.
‘नीट’, ‘सीबीएसई’सह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या पेपरफुटीचा एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात गुरुवारी (ता. ११) आंदोलन करण्यात आले. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची माहिती दिली. ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी आणि ॲड. असीम सरोदे यावेळी उपस्थित होते.
देशभरातील एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे अन्याय झाला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आम्ही कोणाशी भांडण्यासाठी नव्हे, तर शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत. सरकारशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र आमची भूमिका आणि विचार समाजमाध्यमांवरून दडपण्याचा प्रयत्न होत आहे,’’ असा आरोप दिपके यांनी केला.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने या आंदोलनाची सुरुवात येथून होत असल्याचे सांगून दिपके यांनी भविष्यात नागपूर, लखनौ आणि बेंगळुरू येथेही अशाच प्रकारची आंदोलने केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ. चौधरी यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना सांगितले की, ‘‘हे आंदोलन महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अहिंसक विचारांवर आधारित आहे. लोकशाही वाचवायची असेल तर जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. अशा आंदोलनांची विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे.’’असे सांगितले




