मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यत दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे आणि पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पावसाबाबत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबईतील पाऊस आणि त्याचसोबत महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे किती नुकसान झाले आहे याची देखील माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील पावसाची परिस्थिती आणि सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, ‘ २१ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. १५ ते १६ जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण विभागात जास्त पाऊस झाला आहे. कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कुंडलिका, जगबुडीने इशारापातळी ओलांडली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहोत.’
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, ‘नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे २०६ मिमी इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. रावनगाव येथे २२५ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.’
तसंच, ‘हसनाळ येथे ८ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे २० नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे ४० नागरिक अडकले असून ते देखील सुरक्षित आहेत. ५ नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचावकार्य करत आहेत.’
नाशिक विभागात तापी आणि हतनूर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रावेरच्या काही भागात पाणी शिरले आहे. जळगाव जिल्ह्यात बिकट परिस्थिती आहे. 2-3 दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरांचे आणि गुरांचे नुकसान झालेले आहे. पुण्यात पाऊस पडत आहे मात्र कोणत्याही नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




