कर्नाटका | Karnataka
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी कर्नाटकातील म्हैसूर येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान मोदींनी ४२ देशांना भेट दिली, पण मणिपूरमध्ये भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही”, अशा शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मणिपूरमध्ये गेल्या एक वर्षापासून जातीय हिंसाचार आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे, ज्यावर विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
मल्लिकार्जून खरगे पुढे म्हणाले, या देशातील जनता भारतीय जनता पक्षाला आणि आरएसएस संविधान बदलू इच्छिता, पण देशातील जनता त्यांना तसे करु देणार नाही, अशा शब्दांत खरगे यांनी जोरदार टीका केली. या संदर्भातील वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. “देशाच्या ईशान्येकडील राज्य मणिपूर एका वर्षापेक्षा जास्त काळ हिंसाचाराचा सामना करत आहे, परंतु पंतप्रधानांना तिथे जाऊन लोकांचे दुःख समजून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. ४२ देश फिरून आले, पण मणिपूरला भेट देणे गरजेचे वाटले नाही. मणिपूर भारताचा भाग नाही का?” असे म्हणत खरगेंनी खोचक सवाल विचारला आहे.
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षामधील तफावत दाखवत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “काँग्रेस पक्षात लोक कामगिरी करतात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षात लोक फक्त बोलतात”, असेही ते म्हणाले. काँग्रेसने नेहमीच लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवले आहे. भाजपा म्हणते की, कर्नाटक सरकार कंगाल झाले आहे, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. सिद्धरामय्या सरकार राज्याला चांगल्या दिशेने घेऊन जात आहे आणि भाजपाचा हा आरोप निराधार आहे.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




